वीर जवान अमर रहे! शहीद जवान ऋषिकेश जोंधळें अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

| Updated on: Nov 16, 2020 | 10:53 AM

'भारत माता की जय' आणि 'वीर जवान अमर रहे' अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला आहे.

वीर जवान अमर रहे! शहीद जवान ऋषिकेश जोंधळें अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Follow us on

कोल्हापूर : एकीकडे सर्वत्र दिवाळीचा उत्साह असताना दुसरीकडे शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या पार्थिवावर आज बहिरेवाडी इथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. जोंधळे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील असंख्य लोक जमा झाले. गावातल्या प्रत्येकाने आज त्यांच्या शौर्याला अखेरचा सलाम केला. फुलांचा वर्षाव करत नागरिकांनी जोंधळे यांच्या पार्थिवाला वंदन केलं. पाकिस्तानने केलेल्या हल्यात शुक्रवारी ऋषिकेश जोंधळे यांना वीरमरण आलं. आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. (Martyr Jawan Rishikesh Jondhale cremated in his native village in a state funeral)

शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांनी देशाच्या रक्षणासाठी अवघ्या 20 व्या वर्षी आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या या खऱ्या योध्याला नागरिकांनी सलाम केला आहे. पाकिस्तानने 13 नोव्हेंबरला शस्त्रसंधीचं उल्लंघन करून भारताच्या दिशेला बेछूट गोळीबार केला होता. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र, या गोळीबारात महाराष्ट्राने आपला वीरपुत्र गमावला आहे.

अवघ्या 20 व्या वर्षी वीरमरण
ऋषिकेश जोंधळे दोन वर्षांपूर्वी बेळगावमध्ये सैन्यात भरती झाले होते. ते भरती झाल्यापासून जम्मू-काश्मीर येथे सेवा बजावत होते. जोंधळे पुँछ जिल्ह्याच्या सवजियान येथे सीमाभागात तैनात होते. पाक सैन्याकडून शुक्रवारी (13 नोव्हेंबर) पहाटेपासून वारंवार शस्त्रीसंधीचं उल्लंघन केलं जात होतं. पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबाराला उत्तर देताना ऋषिकेश गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराठी हेलिकॉप्टरमधून सैन्याच्या दावाखान्यात नेत असताना त्यांचं निधन झालं.

पाकिस्तानकडून सीमाभागात वारंवार गोळीबार सुरु होता. भारतीय जवानांनीदेखील त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र, या गोळीबारात अवघ्या 20 वर्षांचे महाराष्ट्राचे सुपुत्र ऋषिकेश जोंधळे शहीद झाले. जोंधळे शहीद झाल्याची बातमी बहिरेवाडीच्या गावकऱ्यांना संध्याकाळी समजली. त्यानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली.

संपूर्ण गावावर शोककळा
जोंधळे यांना वीरमरण आल्यानंतर त्यांचं पार्थिव कधी गावी परतणार यासाठी संपूर्ण कोल्हापूर वाट पाहत होतं. अखेर आज 4 दिवसांनी त्यांचं पार्थिव गावी दाखल झालं आहे. ‘भारत माता की जय’ आणि ‘वीर जवान अमर रहे’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला आहे. या सगळ्यात प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये पाणी आहे.

इतर बातम्या – 

Kolhapur | कोल्हापूर जिल्ह्यातील ऋषिकेश जोंधळे यांना वीरमरण, कुटुंबावर शोककळा

Kolhapur | भारत-पाकमध्ये धुमश्चक्री, कोल्हापूर जिल्ह्यातील ऋषिकेश जोंधळे यांना वीरमरण

(Martyr Jawan Rishikesh Jondhale cremated in his native village in a state funeral)