मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करा, भाजप आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

| Updated on: Sep 27, 2020 | 8:03 AM

मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. (MLA Prashant Bamb Write letter to CM Uddhav thackeray for declare Wet drought in Marathwada)

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करा, भाजप आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Follow us on

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघाचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. यामुळे मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी प्रशांत बंब यांनी या पत्राद्वारे केली आहे. तसेच नुकसानीपोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करुन बळीराजाला दिलासा द्यावा, असेही बंब यांनी पत्रात नमूद केले आहे. (MLA Prashant Bamb Write letter to CM Uddhav thackeray for declare Wet drought in Marathwada)

प्रशांत बंब यांचं पत्र 

“गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कधी कोरडा, तर कधी अतिवृष्टी, तर कधी निसर्गाचा लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेती कशी करावी असा प्रश्न मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पडला आहे.

यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाल्याने अपेक्षेप्रमाणे उत्पन्न येईल, असे वाटत होते. मात्र गेल्या 10-12 दिवसांपासून माझ्या गंगापूर-खुलताबाद मतदारसंघात तसेच मराठवाड्यात सर्वच ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे.

माझ्या मतदारसंघातील तसेच मराठवाड्यातील अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशई आलेला घास हिरावला गेला आहे. मूग, उडीद ही पिके ऐन काढणीच्या वेळेस पाऊस पडल्याने शेतातच मुगाला कोंब फुटल्याने शेतकऱ्यांच्या हातातून गेली. त्यात अतिपावसामुळे आता कपाशी, सोयाबीन मोसंबीच्या शेतात पाणी साचले आहे. तर ऊस, मका, बाजरीची पिकं आडवी झाली आहेत.

अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिकाची लागवड केली. मात्र या नासाडीमुळे शेतासाठी लावलेला खर्चही वसूल झालेला नाही. शेतकऱ्यांच्या डोक्यावर आधीच कर्जाचा डोंगर असताना अतिवृष्टीचे संकट आल्याने शेतकरी पूर्णपणे आर्थिक अडचणीत सापडला आहे.

त्यामुळे शासनाने तातडीने माझ्या गंगापूर-खुलताबाद मतदारसंघासह मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच नुकसानीपोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करुन बळीराजाला दिलासा द्यावा,” अशी मागणी प्रशांत बंब यांनी पत्राद्वारे केली आहे. (MLA Prashant Bamb Write letter to CM Uddhav thackeray for declare Wet drought in Marathwada)

संबंधित बातम्या : 

फडणवीसांना भेटणं अपराध आहे का?, राऊतांचा सवाल

मोदी सरकारला मोठा धक्का, अकाली दलाची एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा