दारुची दुकानं सुरु केली, मग मंदिरही खुली करा, मनसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

| Updated on: May 11, 2020 | 6:58 PM

पुण्यातील मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी दारुची दुकानं सुरु केली, मग आता मंदिरही खुली करा अशी मागणी केली आहे (MNS on opening of temple amid lockdown)

दारुची दुकानं सुरु केली, मग मंदिरही खुली करा, मनसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Follow us on

पुणे : देशभरात कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्याअंतर्गत सुरुवातील जीवनावश्यक गोष्टी वगळता सर्व गोष्टींवर बंदी होती. मात्र, लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारने निर्बंधांमध्ये काहीशी शिथिलता आणली. त्यानंतर राज्य सरकारने दारुबंदीवरील निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी दारुविक्री सुरु आहे. हाच मुद्दा पकडत पुण्यातील मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी दारुची दुकानं सुरु केली, मग आता मंदिरही खुली करा अशी मागणी केली आहे (MNS on opening of temple amid lockdown). याबाबत त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित लेखी मागणी केली आहे.

या पत्रात म्हटलं आहे, “महाराष्ट्रात सध्या सर्वच गोष्टींना सुरुवात झाली आहे. सर्व प्रकारची दुकानं सुरु झाली आहेत. घरातून बाहेर पडलो तरी रस्त्यावर गर्दी दिसते. मोलमजुरी करणाऱ्या परप्रांतीय मंडळीसाठी गाड्याही सुरु झाल्या. सर्व गोष्टी ऑनलाईन मिळू लागल्या आहेत. दारुची दुकानं तर 2 ते 5 किलोमीटरच्या रांगा लावून सुरु आहेत. या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेसाठी प्रत्येक दुकानाबाहेर 4-5 पोलीस रांगा लावताना दिसत आहेत. सगळं असं सुखदायक चित्र आहे. या सर्व गोष्टी सुरु असून कोरोनाचा प्रसार होत नाही. बऱ्यापैकी जनताच कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून काळजी घेत आहे. त्यामुळे आता योग्य त्या नियम अटी घालून राज्यातील मंदिरही मुक्त केली पाहिजे.”

सरकारने आपल्या या मागणीवर लवकरात लवकर निर्णय घ्यावं, असंही मनसेने म्हटलं आहे. त्यामुळे मनसेच्या या पत्रानंतर आता राज्य सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. देशभरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गर्दी होईल अशी सर्व ठिकाणं बंद करण्यात आली आहेत. यात अगदी सर्व धार्मिक स्थळांपासून पर्यटन स्थळांचाही समावेश आहे. मात्र, आता सरकारने दारु दुकानं सुरु केल्यानं इतर गोष्टी सुरु करण्यासाठी मागण्या होताना दिसत आहे. त्यामुळे सरकार यातून कसा मार्ग काढणार हे पाहावे लागणार आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने 12 मेपासून टप्प्याटप्प्याने प्रवासी रेल्वे सुरु करण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यावर देखील समिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. काही राज्यांकडून हा निर्णय मागे घेण्याचीही मागणी होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांची तपासणी करुन त्यांच्या कोरोना संसर्गाची माहिती मिळणं आव्हानात्मक असल्याची भूमिका या राज्यांनी घेतली आहे. त्यातच आता मजुरांच्या गावाकडील प्रवासासाठी देखील बस सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. अशावेळी कोरोनाचा संसर्ग रोखणं हे आरोग्य यंत्रणांसमोरील मोठं आव्हान असणार आहे.

MNS on opening of temple amid lockdown