मनसे नेत्या शालिनी ठाकरेंचं ‘निर्भया’ला उपरोधिक पत्र

| Updated on: Feb 10, 2020 | 5:18 PM

वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकाडांतील 24 वर्षीय पीडित शिक्षिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पीडितेच्या मृत्यूनंतर मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी पीडितेला अपरोधिक पत्र लिहिले आहे (MNS Shalini Thackeray letter to Nirbhaya).

मनसे नेत्या शालिनी ठाकरेंचं निर्भयाला उपरोधिक पत्र
Follow us on

वर्धा : वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकाडांतील 24 वर्षीय पीडित शिक्षिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात पीडितेने अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, पीडितेच्या मृत्यूनंतर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी पीडितेला उपरोधिक पत्र लिहिले आहे. हे पत्र त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केलं आहे (MNS Shalini Thackeray letter to Nirbhaya).

या पत्रात पीडितेला न्याय मिळावा यासाठी न्यायालयात जाऊ, असं आवाहन शालिनी यांनी केलं आहे. “पीडितेचं आयुष्य एका क्षणात उद्धवस्त करणाऱ्याला शिक्षा व्हावी म्हणून आम्ही वर्षानुवर्ष न्यायालयात तुझी बाजू मांडू! आणि पुढची 10 वर्ष न्यायालयीन लढ्याच्या बातम्या दैनिकांच्या आतल्या पानांवर येत राहतील, अशी तरतूद करु”, असं शालिनी ठाकरे म्हणाल्या (MNS Shalini Thackeray letter to Nirbhaya).

शालिनी ठाकरे यांचं पत्र

“प्रिय ‘निर्भया’,
कुणीतरी तुझ्यावर अॅसिड टाकतं, कुठेतरी तुझ्यावर बलात्कार होतो किंवा कधीतरी तुला रॉकेल टाकून पेटवून दिलं जातं. मग तुझं खरं नाव जगाला समजू नये, तुझी ओळख उघड होऊन तुझ्या आणि तुझ्या कुटुंबियांच्या वेदना आणखी वाढू नयेत, म्हणून आम्ही तुझं नामकरण ‘निर्भया’ असं करतो. जी कुणालाही घाबरत नाही, जिला कसलंही भय नाही ती ‘निर्भया’!

महिलांना समान न्याय, समान संधी, समान वेतन आणि त्यातून महत्त्वाचं म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने समान सन्मान देणारी समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा तुला निर्भया हे नाव ठेवणं आम्हाला अधिक सोयीचं वाटतं.

त्यानंतर दोन-चार दिवस महिलांच्या सुरक्षिततेविषयीच्या बातम्या येतात, मोठमोठे लेख लिहिले जातात. निर्भयाच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च आम्ही करु असं सरकार जाहीर करतं! कारण हे सगळं सोपं आहे आमच्यासाठी.

तुझ्यावर घरात, शाळा-कॉलेजात, रस्त्यावर किंवा अगदी ट्रेनमध्ये अत्याचार होणार नाही याची काळजी घेण्यापेक्षा तुझ्या वैद्यकीय खर्च उचलणं सोपं आहे, पटतंय ना!

मग एक दिवस तू थकतेस, दमतेस आणि शेवटच्या श्वास घेऊन मोकळी होतेस. आठ वर्षांपूर्वी तू दिल्लीस होतीस, तीन वर्षांपूर्वी नगरला, गेल्या महिन्यात पुण्यात आणि मागच्या आठवड्यात हिंगणघाटात! पण चिंता करु नकोस. आम्ही तुला न्याय मिळवून देऊ.

आरोपीला शिक्षा व्हावी म्हणून न्यायालयात जाऊ. तुझं आयुष्य एका क्षणात उद्धवस्त करणाऱ्याला शिक्षा व्हावी म्हणून आम्ही वर्षानुवर्ष न्यायालयात तुझी बाजू मांडू! आणि पुढची 10 वर्ष न्यायालयीन लढ्याच्या बातम्या दैनिकांच्या आतल्या पानांवर येत राहतील, अशी तरतूद करु.

आणि हो, एक राहिलंच, तुझ्यासाठी एक मेणबत्ती मोर्चाही काढू!

तुझीच,
सौ. शालिनी जितेंद्र ठाकरे”