Mumbai Child Murder | घरगुती भांडणाचा राग, चार वर्षांच्या चिमुकल्याला मामीने बालदीत बुडवून मारलं!

| Updated on: Jul 02, 2020 | 3:04 PM

चिमुरडा खेळात असताना आरोपी महिलेने त्याला घरात बोलावून त्याचा गळा लेगिंग्जने आवळला. क्रौर्याची परिसीमा म्हणजे त्यानंतरही पाण्यात बुडवून तिने त्याची निर्घृण हत्या केली

Mumbai Child Murder | घरगुती भांडणाचा राग, चार वर्षांच्या चिमुकल्याला मामीने बालदीत बुडवून मारलं!
Follow us on

मुंबई : घरगुती भांडणाचा राग मनात धरुन महिलेने चार वर्षांच्या चिमुरड्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे. नात्याने मामी लागणाऱ्या आरोपी महिलेने चिमुकल्याला आधी गळा आवळून आणि नंतर पाण्याने भरलेल्या बालदीत बुडवून जीवे मारले. (Mumbai Andheri Four Years Old Child Murder by Relative Lady)

अंधेरीच्या सहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत संतोषी माता नगरात ही मन सुन्न करणारी घटना घडली. श्रेयस अमोल कदम या चिमुकल्याने गेल्याच महिन्यात वयाची चार वर्ष पूर्ण केली होती. श्रेयसच्या अकाली निधनाने कदम कुटुंब शोकसागरात बुडाले आहे.

आरोपी महिला मधू गाळेही श्रेयसची मावस मामी. संतोषी माता नगरात कदम कुटुंबाच्या शेजारीच ती राहते. जुना कौटुंबिक राग तिच्या मनात काही दिवसांपासून धुमसत होता.

हेही वाचा : दारु न मिळाल्याने सॅनिटायजर प्यायला, सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू

श्रेयस खेळात असताना मधूने त्याला घरात बोलावून त्याचा गळा लेगिंग्जने आवळला. क्रौर्याची परिसीमा म्हणजे त्यानंतरही पाण्यात बुडवून तिने त्याची निर्घृण हत्या केली. कृत्य लपवण्यासाठी तिने मृतदेह घरातच दडवला होता, मात्र श्रेयसच्या आईनेच तो पहिल्याने तिचा पर्दाफाश झाला.

या प्रकरणी आरोपी मधू गाळे हिला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरु आहे. श्रेयसच्या निधनाने परिसरात शोकाकुल वातावरण असून आरोपी महिलेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.