महावितरणच्या भरती प्रक्रियेला मराठा समाजाचा विरोध, सरकारकडून दिवाळी काळी करण्याचा प्रयत्न, मराठा क्रांती मूक मोर्चाचा आरोप

| Updated on: Nov 14, 2020 | 12:46 PM

महावितरणमधील भरती प्रक्रियेवरुन मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा क्रांती मुक मोर्चाकडून एक प्रसिद्धिपत्रक काढण्यात आलं आहे. त्यात राज्य सरकारला इशारा देण्यात आला आहे.

महावितरणच्या भरती प्रक्रियेला मराठा समाजाचा विरोध, सरकारकडून दिवाळी काळी करण्याचा प्रयत्न, मराठा क्रांती मूक मोर्चाचा आरोप
Follow us on

मुंबई: महावितरणमधील उपकेंद्र सहाय्यक, पदवीधारक शिकाऊ अभियंता या पदाकरिता भरतीप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. ही भरती प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहुन सर्व प्रवर्गातील उमेदवारांना सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग (SEBC)वगळून नियुक्ती आदेश देण्यात येतील आणि अशा उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल, अशी जाहिरात महावितरणकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. (Maratha community opposes MSEDCL recruitment process)

या भरती प्रक्रियेवरुन मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा क्रांती मूक मोर्चाकडून एक प्रसिद्धिपत्रक काढण्यात आलं आहे. त्यात राज्य सरकारला इशारा देण्यात आला आहे. “महाराष्ट्र सरकारने दिपावलीच्या शुभ मुहूर्तावर मराठा समाजाला संक्रांत भेट देण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा समाजाने वारंवार सांगितले आहे. जोपर्यंत मराठा समाजाचा आरक्षण विषय संपत नाही तोपर्यंत भरती प्रक्रिया राबवली जाऊ नये. वरिल निर्णय जे विद्यार्थी पास झाले आहेत. फक्त नियुक्ती आदेश राहिले आहे त्यांचे आहेत. म्हणजे मराठा आरक्षण घेऊन पास झालेल्या विद्यार्थ्यांना हे सरकार बाजूला ठेवून इतरांना नियुक्ती देत आहे. शुभ मुहूर्त हा दिवाळी घेतला कारण सण असल्याने आंदोलन होणार नाही. बाकी सर्व मराठे सूज्ञ आहेत”. अशा शब्दात महावितरणच्या भरती प्रक्रियेला विरोध दर्शनवण्यात आला आहे.

महावितरणच्या या निर्णयाला मराठा समाजाचा तीव्र विरोध आहे. मराठा समाजाची दिवाळी काळी करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याची भावना मराठा समाजाकडून व्यक्त करण्यात येत आहे. SEBC वगळून ऊर्जामंत्री नितीन राऊत इतर प्रवर्गाला नियुक्ती आदेश देत आहे. त्यामुळे संघर्ष अटळ असल्याचा इशारा मराठा समाजानं दिला आहे. महावितरणने दिवाळीच्या पूर्वसंध्येला हा निर्णय घेतला आहे. मराठा समाज काही करु शकत नाही, असं महाराष्ट्र सरकारनं गृहीत धरु नये, असा इशारा मराठा समाजानं दिला आहे.

मराठा समाज नाराज नाही- नितीन राऊत

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भरती प्रक्रियेबाबत मराठा समाज नाराज नसल्याचं म्हटलंय. मराठा समाजाच्या काही मुलांना ओपनमध्ये तर काहींना SEBC मध्ये सामावण्यात आलं असल्याची माहिती नितीन राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे मराठा समाज महावितरणच्या भरती प्रक्रियेबाबत नाराज नसल्याचं म्हटलंय.

संबंधित बातम्या:

वीज कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर; ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची घोषणा

मुंबई आणि एमएमआर विभाग ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर करणार; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा निर्धार

Maratha community opposes MSEDCL recruitment process