सर्वात मोठ्या सणावर पुराचे संकट; मुस्लीम बांधवांकडून बकरी ईदची कुर्बानी नाही

| Updated on: Aug 11, 2019 | 9:45 PM

पश्चिम महाराष्ट्रातील महापुरामुळे लाखो लोक बेघर झाले आहेत. त्यामुळे या भागातील बकरी ईद आणि गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणांवर पुराचे संकट आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील मुस्लीम बांधवांनी बकरी ईदला बकरीची कुर्बानी न देता त्या पैशातून पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्वात मोठ्या सणावर पुराचे संकट; मुस्लीम बांधवांकडून बकरी ईदची कुर्बानी नाही
Follow us on

मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील महापुरामुळे लाखो लोक बेघर झाले आहेत. त्यामुळे या भागातील बकरी ईद आणि गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणांवर पुराचे संकट आहे. या पार्श्वभूमीवर मुस्लीम बांधवांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूरमधील मुस्लीम बांधवांनी बकरी ईदला बकरीची कुर्बानी न देता त्या पैशातून पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतही मुस्लीम बांधव बकरी ईदच्या दिवशीच्या खर्चात कपात करुन पूरग्रस्तांना मदत करणार आहेत.

देशभरात सोमवारी (12 ऑगस्ट) बकरी ईद सण साजरा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वत्र खरेदीची धामधूम सुरु आहे. मात्र, महाराष्ट्रात महापुराने थैमान घातल्याने मुस्लीम बांधवांकडून संवेदनशीलतेचे दर्शन घडले. मुस्लीम धर्मात ईदच्या दिवशी बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होतो. नेमक्या याच खर्चाला फाटा देत पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


पूरग्रस्त कुटुंबीयांची मदत करत मुस्लीम बांधवांनी माणूसकी धर्माचे पालन करण्याचा आदर्श निर्णय घेतला आहे. याचं सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विट करत या निर्णयाची प्रशंसा केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये कोल्हापूरमधील मुस्लीम बांधव बकरी न कापता पूरग्रस्तांना मदत करणार असल्याचे म्हटले. तसेच हा कोल्हापूरच्या मुस्लीम नागरिकांचा ऐतिहासिक निर्णय असल्याचे म्हणत हा माझा भारत असल्याचे म्हटले.

दरम्यान, राज्यभरात ठिकठिकाणी सांगली-कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मदत गोळा केली जात आहे. शाळा, महाविद्यालये, वेगवेगळ्या संस्था, कारखाने आणि इतर ठिकाणी देखील मदत गोळा केली जात आहे. गावागावातून धान्य आणि खाद्यपदार्थ जमा करुन पूरग्रस्त भागात पाठवले जात आहेत. अगदी मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनीही पुढाकार घेऊन मदत साहित्य गोळा करण्याचे काम सुरु केले आहे.