आंदोलक शेतकऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून चर्चेचं आवाहन, सर्व समस्या आणि मागण्यांवर संवाद साधण्यास सरकार तयार

| Updated on: Nov 28, 2020 | 8:33 PM

पंजाब सीमेपासून दिल्ली-हरियाणा सीमेवर विविध शेतकरी संघटनेच्या आवाहनानंतर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी केंद्र सरकार तयार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे.

आंदोलक शेतकऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून चर्चेचं आवाहन, सर्व समस्या आणि मागण्यांवर संवाद साधण्यास सरकार तयार
Follow us on

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा करण्यात आला. शेतकरी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवळी केंद्र सरकारला जाग आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आंदोलक शेतकऱ्यांना चर्चेचं आवाहन केलं आहे. (The central government is ready to discuss with the agitating farmers)

“पंजाब सीमेपासून दिल्ली-हरियाणा सीमेवर विविध शेतकरी संघटनेच्या आवाहनानंतर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी केंद्र सरकार तयार आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आंदोलक शेतकऱ्यांना 3 डिसेंबरला चर्चेसाठी बोलावलं आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या सर्व समस्या आणि मागण्यांवर चर्चा करण्यासाठी तयार आहे”, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आंदोलक शेतकऱ्यांना चर्चेसाठी आमंत्रित केलं आहे.

3 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु

केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या 3 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे आज आंदोलक शेतकरी गाजियाबाद-दिल्ली सीमेवर पोहोचले आहेत. किमान आधारभूत किमतीत (MSP)आम्हाला गॅरंटी हवी आहे. आम्ही दुसऱ्या शेतकरी संघटनेसोबत चर्चा करणार आहोत आणि त्यानुसार पुढील पाऊल उचलण्यात येईल, अशी माहिती भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते चौधरी राकेश टिकैत यांनी दिली आहे.

दुसरीकडे बुराडीच्या निरंकारी समागम मैदानात शेतकऱ्यांकडून कृषी कायद्याचा विरोध सुरुच आहे. आम्हाला सरकारवर विश्वास नाही. यापूर्वीही चर्चा झाल्या पण त्यातून काही फायदा झाला नाही. सरकारने आपले कायदे परत घ्यावेत, अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे.

संबंधित बातम्या:

अश्रुधुर आणि वॉटर कॅननचा मारा; शेतकरी आंदोलनाची भारावणारी दृश्यं

मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबमधील शेतकरी आंदोलनं सुरुच, 41 रेल्वेगाड्या रद्द

The central government is ready to discuss with the agitating farmers