यवतमाळमध्ये भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू
यवतमाळ : ट्रक आणि क्रूझरचा भीषण अपघात होऊन 11 जणांचा मृत्यू झाल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली. साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपून परत जाणाऱ्या क्रूझरला ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. कळंब गावाजवळ झालेल्या या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर सहा जण गंभीर जखमी होते, त्यापैकी आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने या अपघातातील मृतांचा आकडा […]
यवतमाळ : ट्रक आणि क्रूझरचा भीषण अपघात होऊन 11 जणांचा मृत्यू झाल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली. साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपून परत जाणाऱ्या क्रूझरला ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. कळंब गावाजवळ झालेल्या या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर सहा जण गंभीर जखमी होते, त्यापैकी आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने या अपघातातील मृतांचा आकडा 11 वर गेला आहे. यवतमाळ-नागपूर मार्गावरील चापर्डा येथे आज रात्री नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने पार्डी सुकळी गावावर शोककळा पसरली आहे.
कळंब तालुक्यातील पार्डी-सुकळी येथील नितीन स्थुल हे कुटुंबासह यवतमाळ येथील वाघापूर येथे साक्षगंधकरिता गेले होते. हा कार्यक्रम आटोपून ते सोमवारी रात्री आपल्या गावाकडे क्रूझरने परत निघाले. नागपूरहून यवतमाळकडे जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्यांच्या क्रुझरला धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, क्रूझरमधील नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले होते, त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच कळंबचे ठाणेदार नरेश रणधीर, वाहतूक पोलीस आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून मृतदेह कळंब येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तर जखमींना कळंबच्या ग्रामीण रुग्णालय आणि यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.