हॉटेल-रेस्टॉरंट सुरु झाल्याने कांद्याच्या मागणीत वाढ; किरकोळ बाजारात कांदा नव्वदीपार

| Updated on: Oct 20, 2020 | 8:35 AM

उन्हाळी कांद्याचा साठा संपत चालला असून अतिवृष्टामुळे खरिपाच्या कांद्याचे नुकसान झाले आहे. | Onion Price

हॉटेल-रेस्टॉरंट सुरु झाल्याने कांद्याच्या मागणीत वाढ; किरकोळ बाजारात कांदा नव्वदीपार
Follow us on

मुंबई: गेल्या काही दिवसांत परतीच्या पावसाचा फटका बसल्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले असताना आता सामान्यांना कांद्याच्या दरवाढीला सामोरे जावे लागत आहे. मुंबई महानगरात कांद्याच्या किरकोळ दराने 70-90 रुपयांवर झेप घेतली, तर पुणे परिसरात तो 50 ते 70 रुपयांच्या घरात पोहोचला. राज्य सरकारने हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरु करण्यास परवानगी दिल्यामुळे कांद्याच्या मागणीत अचानक मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे लवकरच कांदा शंभरी गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसे झाल्यास सामान्य लोकांच्या घरातील बजेट कोलमडू शकते. (Onion price increases in retail market)

उन्हाळी कांद्याचा साठा संपत चालला असून अतिवृष्टामुळे खरिपाच्या कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात कांद्याचे नवीन पीक येण्यास विलंब लागेल. परिणामी देशात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये सोमवारी 705 टन कांद्याची आवक झाली असून घाऊक बाजारातच कांद्याचा प्रतिकिलो दर 40 ते 70 रूपयांवर जाऊन पोहोचला आहे.

ही परिस्थिती लक्षात घेता दर नियंत्रणात ठेवण्यासाठी एपीएमसी बाजारात इराणवरून कांद्याची आयात करण्यात आली आहे. सोमवारी मुंबई बंदरात 600 टन इराणी कांदा दाखल झाला आहे. यातील 25 टन कांदा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येईल. त्यामुळे कांद्याचे दर पूर्ववत होतील, असा अंदाज आहे.

मात्र, हा कांदा स्थानिक बाजारपेठांमध्ये पोहोचेपर्यंत येथील दर चढेच राहतील. सध्या मुंबई, पुणे, नाशिक आणि अहमदनगरमधून मुंबईत कांद्याची आवक होत आहे. मध्यम दर्जाचा कांदा 60 व चांगल्या दर्जाचा कांदा 80 रुपये किलो दराने विकला जात आहे. आवक सुरळीत होईपर्यंत पुढील दोन महिने कांद्याचे दर तेजीत राहतील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

लासलगावातही मोठी भाववाढ
राज्यातील कांद्याची प्रमुख बाजारपेठ असणाऱ्या नाशिकच्यालासलगावमध्ये पाच दिवसांपूर्वी कांद्याचा क्विंटलचा दर सरासरी ४३०० रुपये होता. सोमवारी कांद्याला क्विंटलमागे किमान १२०० ते कमाल ७०८२, तर सरासरी ६४०० रुपये भाव मिळाला. उपाहारगृहे, रेस्टॉरंट सुरू झाल्याने कांद्याची मागणी वाढणे हे दरवाढीचे प्रमुख कारण असल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

परदेशातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात, जेएनपीटी बंदरात 600 टन कांदा दाखल

कांदा आयात केल्यास केंद्र व राज्यातील मंत्र्यांना फिरकू देणार नाही, शेतकरी संघटनेचा इशारा

कांदा निर्यातबंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा घोटाळाच, शिवसेनेचा घणाघात

(Onion price increases in retail market)