कोश्यारींचे वर्तन पदाला न शोभणारे, राजू शेट्टींचे टीकास्त्र, केंद्र सरकारवर पक्षपाताचा आरोप

| Updated on: Oct 18, 2020 | 1:53 PM

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं वर्तन आश्चर्य वाटणारे आहे, त्या पदाला न शोभणारे आहे, अशी टीकाही राजू शेट्टी यांनी केली.

कोश्यारींचे वर्तन पदाला न शोभणारे, राजू शेट्टींचे टीकास्त्र, केंद्र सरकारवर पक्षपाताचा आरोप
Follow us on

सांगली : राज्य सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, तर केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती निवारण कक्षामार्फत भरीव मदत महाराष्ट्राला द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. मदत देण्याबाबत केंद्र सरकार पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप शेट्टींनी केला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं वर्तन आश्चर्य वाटणारे आहे, त्या पदाला न शोभणारे आहे, अशी टीकाही राजू शेट्टी यांनी केली. (Raju Shetti demands to announce Drought in Maharashtra)

“संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं असून, शेतकऱ्यांचं 50 हजार कोटींचं नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा आणि केंद्र सरकारनेही राष्ट्रीय आपत्ती निवारण कक्षामार्फत भरीव मदत महाराष्ट्राला द्यावी, मात्र मदत देण्याबाबत केंद्र सरकार हे पक्षपातीपणा करत आहे” अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. ते सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत द्या”

“केंद्र सरकारने मदत देताना आपली बाजू झटकू नये, तात्काळ राष्ट्रीय आपत्ती निवारण कक्षामार्फत 35 हजार कोटींची मदत महाराष्ट्राला द्यावी. तसेच केंद्राने एनडीआरएफ पथक लगेच राज्यात पाठवावं” असं राजू शेट्टी म्हणाले. “उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्याआधी मागील वर्षी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती, आता तर ठाकरे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांनी आत्ता शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत द्यावी” अशी मागणीही शेट्टींनी केली.

पडळकर-सुरेश धसांवर शेट्टींची टीका

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही वारंवार आवाज उठवला आहे. अनेक आंदोलनं उभी केली आहेत. मात्र ऊस तोडणी मजुरांसाठी पहिल्यांदाच आंदोलन करणाऱ्या नेत्यांचा नेमका हेतू कोणता आहे हे तपासणे गरजेचे आहे. असे वक्तव्य करत माजी खासदार राजू शेट्टी यांनी आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सुरेश धस यांच्यावर टीका केली.

“कोश्यारींचं वर्तन पदाला न शोभणारं”

राज्यपाल हे घटनात्मक पद आहे, मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं वर्तन आश्चर्य वाटणारे आहे. कोश्यारींचं वर्तन त्या पदाला न शोभणारे आहे. पंतप्रधान मोदी यांच्या काळात घटनात्मक पदांचं अवमूल्यन होत असून ते लोकशाहीला घातक आहे, अशी टीकाही राजू शेट्टी यांनी केली.
पंतप्रधान मोदी यांनी जागतिक स्तरावर आवाज उठवून आपत्ती व्यवस्थापन कक्ष निर्माण व्हावे, त्याद्वारे मदत नुकसानग्रस्त देशांना मिळू शकेल, अशी अपेक्षा राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. (Raju Shetti demands to announce Drought in Maharashtra)

संबंधित बातम्या 

गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन 25 हजार मदतीची मागणी, आता मुख्यमंत्री आहात, तातडीने मदत करा : राजू शेट्टी

कंगनासारख्या नटवीनं शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणं यापेक्षा दुसरा विनोद नाही : राजू शेट्टी

(Raju Shetti demands to announce Drought in Maharashtra)