‘रॉ’चे प्रमुख नेपाळमध्ये; देशातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी आणि पंतप्रधानांशी दोन तास गुप्त चर्चा

| Updated on: Oct 23, 2020 | 7:55 AM

'रॉ'च्या अधिकाऱ्यांनी देशातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. | R&AW chief

रॉचे प्रमुख नेपाळमध्ये; देशातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी आणि पंतप्रधानांशी दोन तास गुप्त चर्चा
Follow us on

काठमांडू: भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून नेपाळमध्ये महत्त्वपूर्ण हालचाली घडत आहेत. भारताच्या रिसर्च अँण्ड अ‍ॅनालिसिस विंग (R&AW) या संस्थेचे प्रमुख सामंत कुमार गोयल यांनी नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली शर्मा यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी ‘रॉ’चे एक पथक विशेष विमानाने बुधवारी काठमांडूला गेले होते. याठिकाणी ‘रॉ’च्या अधिकाऱ्यांनी देशातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. तसेच पंतप्रधान के.पी. ओली शर्मा यांच्याशी ‘रॉ’च्या प्रमुखांनी दोन तास गुप्त चर्चा केली. या भेटीचा कोणताही तपशील सार्वजनिक करण्यात आलेला नाही. भारताकडून ही केवळ एक औपचारिक भेट असल्याचे सांगण्यात आले. (R&AW chief meets KP Oli)

या भेटीवरून सध्या नेपाळमध्ये गदारोळ माजला आहे. नेपाळचे तीन माजी पंतप्रधान आणि के.पी. ओली यांच्या पक्षातील नेत्यांनीच या भेटीचा तपशील जाहीर करावा, अशी मागणी लावून धरली आहे. रॉ प्रमुख आणि के.पी. ओली बुधवारी रात्री चर्चेसाठी बसले होते. ही बैठक मध्यरात्रीपर्यंत सुरु असल्याचे कळते. विशेष म्हणजे या सर्व भेटीगाठी आणि बैठकीदरम्यान नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी त्याठिकाणी उपस्थित नव्हते. त्यामुळे भारत आणि नेपाळ यांच्यात पडद्यामागे सुरु असलेल्या हालचालींविषयी अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

सध्या सीमारेषेवर चीनसोबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नेपाळची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरु शकते. देशातील विकासकामांसाठी मोठ्याप्रमाणावर निधी पुरवून चीन नेपाळला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहे. नेपाळचे माजी पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड हे चीनधर्जिणे मानले जायचे. त्यांच्या काळात भारत आणि नेपामधील संबंधामध्ये दुरावा आला होता. त्यामुळे रॉ प्रमुख आणि के.पी. ओलींच्या या भेटीत नक्की काय घडले, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.

लवकरच भारतीय लष्करप्रमुख एम.एम. नरवणे नेपाळच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याची घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी मंत्रिमंडळात महत्त्वपूर्ण बदल केले होते. ओली यांनी सरकारमधील उपपंतप्रधान असलेले ईश्वर पोखरेल यांच्याकडून संरक्षणमंत्रीपद काढून घेतले होते. आता स्वत: ओली संरक्षण मंत्रालयाचा कार्यभार सांभाळत आहेत.

संबंधित बातम्या:

नेपाळ वठणीवर, संरक्षण मंत्र्यांना हटवलं, लष्करप्रमुख नरवणेंच्या दौऱ्यापूर्वी हालचाली

चीनची घुसखोरी थांबेना, मित्र असलेल्या नेपाळमध्येही जमीन लाटली

Special Report | नेपाळमधील हिंदू देणार भारताची साथ?

(R&AW chief meets KP Oli)