‘कुटुंब नियोजनामुळे हिंदुंच्या संख्येत घट’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचं आक्षेपार्ह वक्तव्य

| Updated on: Oct 27, 2020 | 11:35 AM

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी पुन्हा एकदा आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. कुटुंब नियोजनामुळे हिंदुंच्या संख्येत घट होत असल्याचं वक्तव्य प्रज्ञासिंह यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानावरुन आता राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.

कुटुंब नियोजनामुळे हिंदुंच्या संख्येत घट, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
Follow us on

भोपाळ: कुटुंब नियोजनामुळं देशात हिंदुंच्या संख्येत घट होत असल्याचं आक्षेपार्ह वक्तव्य भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलं आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये छोला दसरा मैदानात विजयादशमी निमित्त आयोजित कार्यक्रमात साध्वी प्रज्ञासिंह पोहोचल्या. त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते कमलनाथ, दिग्विजय सिंह आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यावर तोफ डागली. सोबतच कुटुंब नियोजनाबाबत जनतेला एक सल्लाही देऊन टाकला. कुटुंब नियोजनामुळेच हिंदुंच्या संख्येत घट होत असल्याचं सांगत त्यांनी कुटुंब नियोजन करु नका असा सल्लाच अप्रत्यक्षपणे देऊन टाकला. (BJP MP Sadhvi Pradnya Singh on family plaining of Hindu)

भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी विजयादशमी निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना कुटु्ंब नियोजनामुळे हिंदुंची संख्या घटत असल्याचं म्हटलं. हिंदुंनी आपल्या मुलांचं संरक्षण करावं. देवाने तोंड दिलं आहे तर तो घासही देईल. आपण सावध झालो नाही तर आता जे धन कमवत आहात त्याचा उपयोग करण्यासाठी तुमच्या मुलांकडे काही नसेल. इतिहास सांगतो की इतिहासातून सावध राहणं शिकलं पाहिजे. त्यामुळे तुमच्या मुलांना राष्ट्रवाद शिकवा. आपल्या देशासाठी समर्पित होण्याची भावना त्यांच्या मनामध्ये रुजवा”, असा सल्ला साध्वी प्रज्ञासिंह यांनी हिंदुंना दिला आहे. दरम्यान साध्वी प्रज्ञासिंह यांच्या या वक्तव्यावरुन आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.

विरोधी पक्षनेते कमलनाथांवर निशाणा

मध्य प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेते कमलनाथ यांनी एका महिला भाजप उमेदवाराबद्दल आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला होता. त्यावरुनही प्रज्ञासिंह यांनी कलमनाथ यांच्यावर जोरदार निशाणा साधला. भारतीय असाल तर महिलांचा सन्मान करणं शिका, नाहीतर रावणाच्या पुतळ्याप्रमाणे तुमचीही अवस्था होईल, अशा इशाराच प्रज्ञासिंह यांनी कमलनाथ यांना दिला. भाजपच्या महिला उमेदवाराबद्दल ज्यांनी आयटम हा शब्द वापरला, ते आपली आई, बायको, बहिण यांनाही याच नावाने आवाज देतात का? असा सवाल प्रज्ञासिंह यांनी कमलनाथांना केलाय.

दिग्विजय सिंह आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यावरही प्रहार

“भोपाळची जनता धर्म आणि अधर्मात भेद करणं जाणते. लोकसभा निवडणूक ही धर्म आणि अधर्म अशीच लढली गेली आणि भोपाळच्या जनतेनं त्यांना दाखवून दिलं की अधर्मावर नेहमी धर्माचाच विजय होत असतो”, अशा शब्दात प्रज्ञासिंह यांनी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर तोफ डागली. तर मेहबुबा मुफ्ती यांच्या आम्ही तिरंगा उचलणार नाही या विधानावरही जोरदार हल्ला चढवला. “अब देश में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा”, अशा इशाराच त्यांनी मुफ्ती यांना दिला आहे.

संबंधित बातम्या:

विरोधी पक्षांच्या मारक शक्तीमुळे भाजपने ज्येष्ठ नेते गमावले, प्रज्ञासिंह ठाकूर पुन्हा बरळल्या

साध्वी प्रज्ञाविरोधात प्रचारासाठी महाराष्ट्रातून 200 सामाजिक कार्यकर्ते भोपाळमध्ये जाणार

BJP MP Sadhvi Pradnya Singh on family plaining of Hindu