मंदिरं उघडण्याचा निर्णय हेडलाइन घेण्यासाठी तर नाही ना?; निरुपम यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

| Updated on: Nov 15, 2020 | 1:42 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तब्बल आठ महिन्यानंतर राज्यातील धार्मिकस्थळं उघडण्याची परवानगी दिली असली तरी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी टीका केली आहे. (sanjay nirupam slams uddhav thackeray over temples reopening decision)

मंदिरं उघडण्याचा निर्णय हेडलाइन घेण्यासाठी तर नाही ना?; निरुपम यांचा मुख्यमंत्र्यांना टोला
Follow us on

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तब्बल आठ महिन्यानंतर राज्यातील धार्मिकस्थळं उघडण्याची परवानगी दिली असली तरी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी टीका केली आहे. कालपर्यंत मुख्यमंत्री दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचं सांगत होते आणि आज त्यांनी मंदिरं उघडण्याचा निर्णय घेतला. याचं आश्चर्य वाटतं, असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय हेडलाइन घेण्यासाठी आहे की यामागे काही प्रशासकीय धोरण आहे?, असा टोला संजय निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. (sanjay nirupam slams uddhav thackeray over temples reopening decision)

संजय निरुपम यांनी ट्विट करून हा सवाल केला आहे. धार्मिकस्थळं सुरू करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. पण दिवाळीनंतर कोरोनाची नवी लाट येणार असल्याचं मुख्यमंत्री कालपरवापर्यंत जोर देऊन सांगत होते आणि आज हा निर्णय घेतला? हा निर्णय आश्चर्यकारक वाटत नाही का?, असा सवाल करतानाच हा निर्णय वृत्तपत्रांच्या हेडलाइनसाठी घेतलाय की यामागे काही प्रशासकीय धोरणही आहे, असा टोला निरुपम यांनी लगावला.

दरम्यान, मंदिरं सुरू करण्याची घोषणा करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला महत्त्वाचं आवाहनही केलं आहे. दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच, असं सांगत यापुढेही शिस्तीचं पालन करा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

या काळात सर्वच प्रार्थनास्थळे बंदी असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉयच्या रूपाने ‘देव’ पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता उद्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

 

संबंधित बातम्या:

हिंदुत्त्वाचा विजय झाला, ‘श्रीं’नी सरकारचा अहंकार घालवला : तुषार भोसले

Diwali 2020: भारतासह ‘या’ 10 देशांमध्ये मोठ्या उत्सहात साजरी होते दिवाळी, वाचून आश्चर्य वाटेल

ही ‘श्रीं’ची इच्छा! पाडव्यापासून मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडत आहोत; मुख्यमंत्र्यांची दिवाळी भेट!

(sanjay nirupam slams uddhav thackeray over temples reopening decision)