पुणे : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवार की अमित शाह, यांच्यापैकी अधिक भीती कुणाची?, असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर संजय राऊत यांनी त्यांच्या बेधडक अंदाजात उत्तर दिलं.. (Sanjay Raut on Amit Shaha And Sharad Pawar)
“भीती कशाला हवी कोणाची…? शरद पवार किंवा अमित शाह भीतीदायक आहेत, असं मला वाटतं नाही … एक आहे की त्यांच्या पक्षातल्या लोकांना त्यांची भीती आवश्यक आहे. शरद पवारांची भिती असण्याचं काही कारण नाही. त्यांच्याइतका लोकांमध्ये जाणारा लोकनेता मी पाहिला नाही”, असं बेधडक उत्तर राऊत यांनी दिलं.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही लोक घाबरायचे. पण त्यांना भेटायचे तेव्हा त्यांच्या प्रेमात पडायचे. त्यामुळे पवार किंवा शाह यांना घाबरण्याचं तसं काही कारण नाही”, असं ते म्हणाले.
राज्यपाल कोश्यारी सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद
पुण्यात श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमाला संबोधित करताना संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. राज्यपाल सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद आहे. भाजपचे लोकही पवारांना नेता मानतात. आता राज्यपालही मानू लागले आहेत. त्यामुळे मी पवारांना भेटून राज्यपालांना मार्गदर्शन करायला सांगणार आहे, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला.
थेट राज्यपालांची भेट घेणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. ते लोकनियुक्त मुख्यमंत्री आहेत. त्यांना राज्याचे निर्णय घेण्याचे कार्यकारी अधिकार आहेत. पण असं असताना काही लोक मुख्यमंत्र्यांना भेटत नाहीत. त्याऐवजी लोकांचे प्रश्न घेऊन थेट राज्यपालांना भेटतात. राज्यपालांना कार्यकारी अधिकार नसतानाही भेटतात. हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीकाही त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव न घेता केली.
ठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या पण…
आम्ही सत्तेत आलो तेव्हा आमच्या सरकारला हिणवलं गेलं. ठाकरे सरकार अल्पावधीतच कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या. पण पुढच्या महिन्यात आम्ही एक वर्ष पूर्ण करत आहोत, असा चिमटा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला काढला
(Sanjay Raut on Amit Shaha And Sharad Pawar)
संबंधित बातम्या
बाळासाहेबांच्या काळात राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत होता, आता पुण्यात; राऊतांचं सूचक विधान