पंतप्रधान बोलत का नाहीत?; जनतेला हाथरसच्या घटनेचं सत्य सांगा; शिवसेनेची मागणी

| Updated on: Oct 02, 2020 | 1:48 PM

हाथरसच्या कन्येच्या शरीराची जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही विटंबना झाली आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी जनतेला विश्वासात घेऊन हाथरसच्या घटनेवर बोलावं. जनतेला सत्य सांगावं, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

पंतप्रधान बोलत का नाहीत?; जनतेला हाथरसच्या घटनेचं सत्य सांगा; शिवसेनेची मागणी
Follow us on

मुंबई: उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकशाहीचा गळा घोटला आहे. रामाच्या भूमीत सर्व नियम आणि कायदे उधळून लावले आहेत. हाथरसच्या घटनेनं संपूर्ण देश हादरून गेला असून त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी का बोलत नाही?, असा सवाल करतानाच पंतप्रधानांनी देशातील जनतेला विश्वासात घेऊन सत्य सांगावं, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. (shivsena leader sanjay raut slams bjp)

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हाथरसच्या घटनेवरून भाजपवर जोरदार टीका केली. हाथरसच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. हा खरेतर महिला वर्गावरील अत्याचार आहे. हाथरसच्या कन्येच्या शरीराची जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही विटंबना झाली आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी जनतेला विश्वासात घेऊन हाथरसच्या घटनेवर बोलावं. जनतेला सत्य सांगावं, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. हाथरसच्या घटनेमुळे देशभर सन्नाटा पसरला आहे. लोकांना त्यावर व्यक्त व्हायचं आहे. पण जनतेमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळेच लोकं मौन आहेत, असंही ते म्हणाले.

हिंदुत्ववादी सरकारने धर्मग्रंथ वाचावेत

हाथरससारख्या घटना घडल्यावर मीडियाने सत्यकथन कारयला हवं. जे घडलं ते समोर आणायला हवं. त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण होत नाही. त्यामुळे मीडियाला घटनास्थळी जाऊ दिलं पाहिजे, असं सांगतानाच पहाटे २ वाजता रात्रीच्या काळोखात हाथरसच्या कन्येचा मृतदेह पेट्रोल ओतून जाळण्यात आला. तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले नाही. ज्यांना जर हे अंत्यसंस्कार वाटत असतील तर त्यांनी हिंदू धर्माचे ग्रंथ आणि पोथ्या वाचाव्यात. अंत्यसंस्काराबाबत आपल्या धर्मात काही वचनं आहेत. मार्गदर्शन करमअयात आलं आहे. हिंदुत्ववादी सरकारने या पोथ्या वाचाव्यात, असा टोलाही त्यांनी योगी सरकारला लगावला.

योगी आदित्यनाथ भगवे कपडे घालतात. ते संन्यासी आहेत. गेल्याच महिन्यात त्यांनी आणि पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशात सीतामाईची पूजा केली. आज सीतामाईही हाथरसच्या कन्येच्या किंकाळ्या ऐकून व्यथित झाली असेल. पुन्हा धरणी दुभंगून मला पोटात घ्या म्हणत असेल, असंही ते म्हणाले. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार आणि राजस्थान या चार राज्यात गेल्या काही महिन्यांत १७ हजार गँगरेपच्या घटना घडल्याचा दावाही त्यांनी केला. (shivsena leader sanjay raut slams bjp)

हा आंबेडकरांच्या घटनेचा अपमान

एका नटाने मुंबईत आत्महत्या केली. त्याला हत्या ठरवण्याचा प्रयत्न झाला. हाथरसमध्ये बलात्कार पीडितीने तिच्यावर बलात्कार झाल्याचं कॅमेऱ्यासमोर सांगितलं. तरीही तिच्यावर बलात्कार झालाच नसल्याचा कांगावा केला जात आहे. हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेचा अपमान आहे, अशी टीका त्यांनी केली.

दलित नेते कुठे आहेत? एसआयटी चौकशी करा

एका नटीचं अनधिकृत बांधकाम पाडलं म्हणून तिच्या स्वागतासाठी विमानतळावर उभे असलेले दलित नेते आता कुठे आहेत? दलित नेते कुठे गेलेत त्याची खरंतर एसआयटी मार्फत चौकशी केली पाहिजे, असं सांगतानाच हाथरसप्रकरणी कंगना रानौतचं तोंड बंद का आहे?, असा सवालही त्यांनी केला.

धक्काबुक्कीची चौकशी करा

राहुल गांधी यांना काल यूपी पोलिसांनी धक्काबुक्की केली. एका प्रमुख नेत्याला धक्काबुक्की करणं धक्कादायक आहे. गांधी परिवाराचं बलिदान विसरणाऱ्यांना इतिहास कधीच माफ करणार नाही, असं सांगतानाच राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीची चौकशी करा, अशी मागणीही त्यांनी केली.

संबंधित बातम्या:

देशात अराजक माजलंय; सरकारने चूक कबूल करावी; सुप्रिया सुळेंनी सुनावलं

यूपी पुन्हा गँगरेपने हादरली, बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू

उत्तर प्रदेश पोलिसांकडून राहुल गांधींना धक्काबुक्की, कॉलर पकडून ताब्यात घेतलं

उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा; मायावतींची मागणी

(shivsena leader sanjay raut slams bjp)