25 लाखांसाठी अपहरण, मग हत्या, अडीच महिन्यानंतर अल्पवयीन मुलाचा मृतदेह सापडला

| Updated on: Feb 22, 2020 | 8:58 AM

साताऱ्यात 25 लाखांच्या खंडणीसाठी एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन हत्या करण्यात आली. गेल्या अडीच महिन्यानंतर या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.

25 लाखांसाठी अपहरण, मग हत्या, अडीच महिन्यानंतर अल्पवयीन मुलाचा मृतदेह सापडला
Follow us on

सातारा : साताऱ्यात 25 लाखांच्या खंडणीसाठी एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन हत्या (Satara Kidnapping And Murder) करण्यात आली. गेल्या अडीच महिन्यानंतर या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

साताऱ्यातील नागठाणेजवळील अष्ठे गावातील तेजस विजय जाधव (वय 17) या बेपत्ता मुलाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली (Satara Kidnapping And Murder). तब्बल अडीच महिन्यानंतर या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली असून आशिष साळुंखे, साहिल शिकलगार, शुभम उर्फ सोन्या जाधव अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या तिघांवर तेजसच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तेजस अडीच महिन्यांपासून बेपत्ता होता

तेजसला व्यायामाची आवड असल्यामुळे तो नेहमीप्रमाणे 11 डिसेंबर 2019 रोजी नागठाणे येथे व्यायामासाठी दुचाकीवरून गेला. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला असता. मात्र, तो कुठेही सापडला नाही. त्यानंतर त्याच्या वडिलांनी बोरगाव पोलीस ठाण्यात तेजस बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली.

दरम्यान, तेजस बेपत्ता झाला त्याच दिवशी त्याची दुचाकी आष्टे गावाजवळ सापडली. त्या ठिकाणी दुसऱ्या एका गाडीची चावीसुद्धा आढळून आली होती. हा सारा प्रकार वडील विजय जाधव यांनी बोरगाव पोलिसांना सांगितला होता. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस तेजसचा शोध घेत होते. यादरम्यान, तेजसच्या वडिलांना एक फोन आला. ‘तुमच्या मुलाचे 25 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केले आहे’, असं खंडणीखोराने सांगितलं.

तेजसच्या वडिलांनी याबाबतची माहिती बोरगाव पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासादरम्यान आशिष साळुंखे याला ताब्यात घेतले. मात्र, त्याच्याकडून फारशी माहिती उपलब्ध न झाल्याने त्याला सोडून देण्यात आले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलिसांनी आशिष साळुंखे आणि त्याचा मित्र साहिल शिकलगार यांना ताब्यात घेतलं. यांची कसून चौकशी केली. तेव्हा त्यांनी तेजसची हत्या केल्याचं सांगितलं.

त्यावेळी या खून प्रकरणाचा उलगडा झाला. आशिष साळुंखे आणि त्याचे मित्र साहिल शिकलगार, शुभम उर्फ सोन्या जाधव यांना पोलिसांनी त्याब्यात घेतले. या तिघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली. तसेच, तेजसचा मृतदेह कुठे आहे याचाही माहिती दिली.

तेजसची हत्या केल्यानंतर या तिघांनी त्याचा मृतदेह नागठाणे येथील एका विहिरीमध्ये तळाला बांधून ठेवला होता. त्यामुळे तो वर आला नाही आणि कुणाला दिसलाही नाही. पोलिसांनी शुक्रवारी मोटार लावून पाणी बाहेर काढले आणि त्यानंतर तेजसचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. या तिघांनी तेजसचे अपहरण का केले आणि त्याची हत्या का केली याचा तपास पोलीस करत आहेत (Satara Kidnapping And Murder).