लॉकडाऊनमध्ये काम न मिळाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ, पुण्यात बस चालकाची आत्महत्या

| Updated on: May 06, 2020 | 5:58 PM

लातूर जिल्ह्यातील वैरागड येथील विवाहित तरुणाने लॉकडाऊनमुळे रोजगार मिळत नसल्याने पुण्यात आत्महत्या केली आहे (Suicide due to no job amid lockdown in Pune).

लॉकडाऊनमध्ये काम न मिळाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ, पुण्यात बस चालकाची आत्महत्या
Follow us on

लातुर : कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभरात अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्यात आला. मात्र, यामुळे अनेक कंपनी आणि उद्योगधंदे बंद पडल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याचं पाहायला मिळतं आहे. लातुरमध्ये देखील असंच एक उदाहरण समोर आलं आहे. जिल्ह्यातील वैरागड येथील विवाहित तरुणाने लॉकडाऊनमुळे रोजगार मिळत नसल्याने पुण्यात आत्महत्या केली आहे (Suicide due to no job amid lockdown in Pune). गणेश भदाडे (वय 33 वर्षे) असं या युवकाचं नाव आहे. त्याच्या कुटुंबीयांनी त्याने काम मिळत नसल्यानं निराशेतून आत्महत्या केल्याचं सांगितलं आहे.

गणेश भदाडे हा युवक एका खासगी शाळेच्या बसवर चालक होता. मात्र, आता लॉकडाऊन लागू झाल्याने शाळा बंद झाल्या. यात त्याचं कामही बंद झाल्यानं रोजगार विना त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. या आत्महत्येच्या घटनेने चालक गणेश भदाडे यांची पत्नी, मुलगा आणि मुलीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरचा कमावता व्यक्ती गेल्याने कुटुंब उघड्यावर आहे. गणेश शेती, व्यवसाय किंवा रोजगार नसल्याने निराशेच्या गर्तेत सापडला होता. अखेर त्याने याच नैराश्येतून गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्यावर अहमदपूर तालुक्यातील वैरागड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत गणेश भदाडे यांची पत्नी आणि मुले यांना सध्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.

लातुर जिल्ह्यातल्या वैरागड या लहानशा खेड्यातील हा विवाहित तरुण पुण्यातील चाकण भागात रोजगारासाठी गेला होता, मात्र लॉकडाऊनमुळे हातचा रोजगार गेल्याने त्याच्यावर अक्षरशः उपासमारीचा प्रसंग ओढवला. या युवकाने भाड्याने राहत असलेल्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेश भदाडे हे चाकण भागातील एका खासगी शाळेच्या स्कुल बसवर चालक म्हणून काम करत होते. लॉकडाऊनमुळे त्यांचा हा रोजगार थांबला होता. समाजसेवी संस्था आणि प्रशासन करत असलेली मदत देखील या कुटुंबापर्यंत पोहचू शकली नाही. गणेश आपली पत्नी आणि दोन मुलांसह चाकणमध्ये राहत होते. मुलांना पुरेसे अन्न देता येत नसल्याची भावना गणेश यांच्या मनात घर करुन होती. याच हवालदिल स्थितीत त्यांनी पत्नी आणि मुले घराबाहेर गेल्याचं पाहून गळफास घेऊन आत्महत्या केली.

प्रशासनाच्या परवानगीने त्यांचा मृतदेह गावाकडे म्हणजे अहमदपूर तालुक्यातल्या वैरागड येथे आणण्यात आला. कोरोनाच्या भीतीने अंत्यसंस्कारालाही लोक गेले नाहीत. ग्रामपंचायतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. आता गणेश यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी गावाजवळच्या शेतात क्वारंटाईन आहेत. त्यांच्याकडे अन्नधान्यही नाही. गणेश भदाडे यांच्या वडिलांचं निधन झालेलं आहे. गावातील घरही पडलेलं असून शेतीही नाही. त्यामुळे गणेश भदाडे पुण्यातल्या चाकण भागात रोजगाराला गेले होते. तिथे लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या वाईट परिस्थितीमुळे त्यांना आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घ्यावा लागला. आता त्यांच्या कुटुंबाला सरकारच्या आणि सामाजिक संस्थांच्या मदतीची गरज आहे.

संबंधित बातम्या : 

राज्य सरकारने पुण्याला वाऱ्यावर सोडलं, भाजप शहराध्यक्षांचा आरोप

नोकरभरती रद्द नको, वर्षभर किमान वेतनावर सेवेत घ्या, रोहित पवारांची मागणी

मुंबईत काम करणाऱ्यांची प्रवेशबंदी रद्द, नोकरदारांची मुंबईत सोय होईपर्यंत निर्णय स्थगित

मुंबईत असंच सुरु राहीलं, तर आर्मी बोलवावी लागेल, मग नागरिकांच्या अडचणी वाढतील : किशोरी पेडणेकर

Suicide due to no job amid lockdown in Pune