धार्मिकस्थळं उघडली नाहीत म्हणून ‘सेक्युलर’ संबोधून अवहेलना करणार काय?; शरद पवारांचे पंतप्रधानांना खरमरीत पत्रं

| Updated on: Oct 13, 2020 | 8:21 PM

धार्मिकस्थळं उघडली नाहीत म्हणून लगेच सेक्युलर ठरवून अवहेलना करणार काय?, असा परखड सवाल शरद पवार यांनी मोदींना केला आहे. तसेच राज्यपालांचं हे वागणं संविधानाच्या चौकटीबाहेरचं असल्याची तक्रारही त्यांनी केली आहे.

धार्मिकस्थळं उघडली नाहीत म्हणून सेक्युलर संबोधून अवहेलना करणार काय?; शरद पवारांचे पंतप्रधानांना खरमरीत पत्रं
Follow us on

मुंबई: हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. धार्मिकस्थळं उघडली नाहीत म्हणून लगेच सेक्युलर ठरवून अवहेलना करणार काय?, असा परखड सवाल शरद पवार यांनी मोदींना केला आहे. तसेच राज्यपालांचं हे वागणं संविधानाच्या चौकटीबाहेरचं असल्याची तक्रारही त्यांनी केली आहे. ( sharad pawar writes letter to pm narendra modi )

राज्यातील धार्मिकस्थळे उघडण्यासाठी राज्यभर आंदोलने होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून धार्मिकस्थळं सुरू करण्याच्या सूचना करण्याबरोबरच त्यांना हिंदुत्वाचीही आठवण करून दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही राज्यपालांना पत्रं लिहून आम्हाला हिंदुत्वासाठी आम्हाला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचा टोला लगावला होता. त्यानंतर या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपचे नेते आमनेसामने आले होते. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी थेट पंतप्रधानांना पत्रं लिहून त्यांच्याकडे राज्यपालांची तक्रार केली आहे. या पत्रात राज्यातील कोरोनाची स्थिती आणि राज्यपाल-मुख्यमंत्र्या दरम्यान झालेल्या पत्रव्यवहाराची माहिती देत धार्मिकस्थळं सुरू केली नाहीत म्हणून लगेच सेक्युलर संबोधून अवहेलना करणं योग्य आहे का?, असा सवाल केला आहे.

राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहून राज्यातील सर्व धार्मिकस्थळं सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर धार्मिकस्थळं असून तिथे प्रचंड प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते हे आपण जाणूनच आहात. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, पंढरपूरमधील विठ्ठलाचे मंदिर, शिर्डीतील साईबाबा मंदिरात इतर दिवशीही भाविकांची मोठी गर्दी असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही दो गज की दुरी ठेवण्याचं आवाहन जनतेला केलं आहे. मात्र, या धार्मिकस्थळी होणारी गर्दी पाहता तिथे सोशल डिस्टन्सिंगचं पालन होणंच शक्य नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने धार्मिकस्थळे टप्प्याटप्प्याने सुरू करणअयाचा निर्णय घेतला आहे. धार्मिकस्थळं सुरू करण्याबाबतचा राज्यपालांचा स्वतंत्र दृष्टीकोण असू शकतो, या मुद्द्याशी मी सहमत आहे. त्यांनी त्यांची भूमिका मुख्यमंत्र्यांपुढे मांडली त्याचंही कौतुक आहे. परंतु, या पत्रात वापरण्यात आलेली भाषा वाचून मला धक्का बसला. शिवाय हे पत्रं मीडियापर्यंत पोहोचवलं गेलं. त्याचाही मला धक्का बसला असं पवारांनी मोदींना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

“हिंदुत्वाचे आपण खंदे पुरस्कर्ते आहात. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अयोध्या दौऱ्यातून आपण भगवान श्रीरामाविषयीच्या भक्तीचे जाहीर दर्शन दिलेत. आषाढी एकादशीला आपण पंढरपुरातील विठ्ठल रखुमाईची पूजा केली होती,” असं राज्यपालांनी या पत्रात नमूद केलं आहे. पूजेसाठी तुम्ही धार्मिकस्थळ उघडली नाहीत तर तुम्ही लगेचच सेक्युलर कसे ठरता? याचच मला आश्चर्य वाटतं. अशा पद्धतीनं अवहेलना करणं योग्य आहे का?, असा सवाल पवारांनी केला आहे. ( sharad pawar writes letter to pm narendra modi )

राजकीय नेत्याच्या भूमिकेतून पत्रं

या पत्रातील भाषा पाहून तुम्हाला माझ्या म्हणण्याची खात्री पटेल याची मला खात्री आहे. सेक्युलर हा शब्द संवैधानिक आहे. मात्र, दुर्देवाने राज्यपालांनी लिहिलेलं हे पत्रं एखाद्या राजकीय नेत्याच्या भूमिकेत असल्यासारखं लिहिलं आहे. माझा लोकशाहीवर नितांत विश्वास आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये विचारांचं, भूमिकेचं मुक्त अदान-प्रदान असावं यावरही माझा विश्वास आहे. मात्र, ते करताना संविधानाच्या चौकटीतच भाषेचा वापर केला गेला पाहिजे, असं सांगतानाच या प्रकरणावर मी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्याशी चर्चा केलेली नाही. मात्र, संविधानिक मूल्यांचा आदर राखला गेलाच पाहिजे या हेतूने मी तुमच्याशी आणि जनतेशी या पत्राद्वारे संवाद साधत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, उद्धव ठाकरे राज्यपालांवर बरसले

तुम्हालाच हिंदुत्व शिकवण्याची गरज; चंद्रकांत पाटील यांचा पलटवार

‘राज्य सांभाळता येत नसल्याने उद्धव ठाकरेंचा तोल सुटतोय; राज्यपालांशी अहंकाराने बोलणे शोभते का?’

( sharad pawar writes letter to pm narendra modi )