रामाच्या फोटोमध्ये मिशा हव्या, लफडेबाजीने सुशांतने आत्महत्या केली असावी : संभाजी भिडे

| Updated on: Aug 03, 2020 | 8:27 PM

संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषद घेऊन, राम मंदिर भूमिपूजनासह विविध मुद्द्यावर भाष्य केलं. (Sambhaji Bhide on Ram Mandir and Sushant Singh)

रामाच्या फोटोमध्ये मिशा हव्या, लफडेबाजीने सुशांतने आत्महत्या केली असावी : संभाजी भिडे
Follow us on

सांगली : शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषद घेऊन, राम मंदिर भूमिपूजन, शिवसेनेची भूमिका, कोरोना आणि सुशांत सिंह राजपूत आत्महत्येबाबत भाष्य केलं. (Sambhaji Bhide on Ram Mandir and Sushant Singh)

“राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा दिवाळी-दसऱ्याप्रमाणे साजरा करावा. कोरोना आणि सोशल डिस्टन्सिंगमध्ये तथ्य नाही. ठाकरे म्हणजे तेजस्वी, त्यांचं ऑनलाईन भूमिपूजनाचं विधान बाळासाहेबांनाही आवडलं नसतं. रामाचा मिशा असलेला फोटो आणि मूर्ती असावी. तसंच आजचे आयडॉल हे नटनट्याऐवजी शिवछत्रपती, श्रीराम, श्रीकृष्ण हे असावेत. सुशांत सिंह राजपूतने लफडेबाजीतून आत्महत्या केली असावी”, असं संभाजी भिडे म्हणाले.

कोरोनामध्ये तथ्य नाही

कोरोनामध्ये तथ्य नाही, लॉकडाऊनमुळे लोकांना मुरगाळून टाकलं आहे. सोशल डिस्टनसिंग पाळू नये, देशातील नेत्यांनी घेतलेला लॉकडाऊनचा निर्णय चुकीचा आहे. 5 ऑगस्टला रामजन्मभूमी उत्सव हा दसरा-दिवाळीसारखा साजरा करा, असं शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी म्हटलं. ते सांगलीत बोलत होते.

5 ऑगस्ट रोजी साधू संत, महंत, नेते हे अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी एकत्र येत आहेत. मांगल्याचा आनंदाचा सण आहे. हा दिवस देशभरातील हिंदूंनी दसरा आणि दिवाळी सारखा आनंद उत्सव करावा. यापुढे रामाचा फोटो, मूर्तीमध्ये मिशा असलेला असावा, असंही संभाजी भिडे म्हणाले.

कोरोना असला तरी तो पत्करुन देशात 5 ऑगस्ट रोजी हिंदूंनी आनंद उत्सव करावा. 5 ऑगस्ट रोजी अयोध्येत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा करावी, असं आवाहन त्यांनी केलं.

शरद पवार-उद्धव ठाकरे गोंधळलेले

शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अर्जुनासारखे गोंधळले आहेत. शरद पवार इतके ज्ञानी असून राम मंदिराबाबत ते असे बोलले कसे? राजकीय चलाकीच असली तरी, राष्ट्रीयदृष्ट्या त्यांचं वक्तव्य पाप आहे, असं टीकास्त्र संभाजी भिडे यांनी सोडलं.

कोरोना म्हणजे, हिंदू समाजाच्या मानसिक दुर्बलतेचं लक्षण आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीदबाबत त्यावेळी केलेले वक्तव्य धाडसच होतं. मात्र आताच्या शिवसेनेच्या नेत्यांनी ‘ऑनलाईन उदघाटन’ करा असं म्हणत असतील तर हे बाळासाहेबांना सुद्धा आवडलं नसते, असं संभाजी भिडे म्हणाले.

शिवसेना या देशात असलीच पाहिजे, हिंदुत्वासाठी शिवसेना आवश्यक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निस्वार्थी परंपरेतील आहेत. कोरोनाच्या थैमानात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यभर फिरुन कोरोना युद्धात सामर्थ्य निर्माण करावं आणि करतील अशी आशा आहे. ठाकरे म्हणजे तेजस्वी, असं संभाजी भिडेंनी नमूद केलं.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी भाष्य

“दुर्दैव असं आहे की समाजाने आदर्श समजले आहे ते सिनेमातील नट आणि नट्या, या नट नट्यांची त्यांची पात्रता काय? लायकी काय? त्यांची उंची काय? या नट नट्यांना आपल्या 1 अब्ज 35 कोटी जनतेचे मार्गदर्शन आणि दिशादर्शक म्हणून हा समाज स्वीकारतो म्हणजे या देशाचे लवकरात लवकर वाटोळे होणार आहे त्याचे ते निदर्शक आहे”, असं संभाजी भिडे म्हणाले.

सुशांत सिंह बद्दल बोलून आयुष्य वाया घालवणे हे सुद्धा चूक आहे. हे आपण करायला नको. सुशांत सिंह हा बेकार माणूस आहे, जर खोलात गेलं तर काही तर लफडेबाज जीवन असेल आणि त्यामुळे त्याने आत्महत्या केली असेल, याची लायकी काय आहे. दुर्दैव हे आहे की उगवता तरुण वर्ग हा नट आणि नट्यांच्या थिल्लर अत्यंत उथळ, टाकाऊ मार्गाचं आकर्षण घेऊन जगतोय हे या देशाचे दुर्दैव आहे, असं संभाजी भिडेंनी नमूद केलं.

देशाला आदर्श असतील तर भगवान श्री कृष्ण, प्रभू रामचंद्र, छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आदर्श धरले पाहिजेत. सुशांत हा लायकीचा पण माणूस नाही, असं टीकास्त्र शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी सोडलं.

(Sambhaji Bhide on Ram Mandir and Sushant Singh)

संबंधित बातम्या 

गाईचे तूप नाकात टाका किंवा गोमूत्र प्यायला द्या; कोरोना बरा होईल : संभाजी भिडे

कोरोना बरा करण्यासाठी सल्ला देणं महागात, संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी