दहावी-बारावीचे निकाल वेळेत लावण्यासाठी एसएससी बोर्डाची लगबग

शिक्षकांना बोर्डाच्या उत्तरपत्रिका घरी घेऊन जाण्याची विशेष सवलत देण्यात आली आहे. दहावी-बारावीचे निकाल वेळेत लावण्यासाठी शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे. (SSC HSC Exam Result may delay)

दहावी-बारावीचे निकाल वेळेत लावण्यासाठी एसएससी बोर्डाची लगबग
| Updated on: Apr 19, 2020 | 3:53 PM

पुणे : एसएससी बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावीचे निकाल वेळेत लावण्यासाठी बोर्डाची लगबग सुरु आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर होणं अशक्य दिसत असल्याने शिक्षकांना उत्तरपत्रिका घरी नेण्याची परवानगी देण्यात आली आहे आहे. (SSC HSC Exam Result may delay)

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या लॉकडाऊनची मुदत वाढवल्यामुळे शाळा-महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे शिक्षकांना बोर्डाच्या उत्तरपत्रिका घरी घेऊन जाण्याची विशेष सवलत देण्यात आली आहे. दहावी-बारावीचे निकाल वेळेत लावण्यासाठी शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे.

अनेक विषयांच्या उत्तरपत्रिका अजूनही पोस्टातच आहेत. परीक्षकांना उत्तरपत्रिका घरी नेण्यातही विलंब होत आहे. पर्यायाने तपासलेल्या उत्तरपत्रिका बोर्डात परत देणेही थांबले आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर होणं अशक्य दिसत आहे.

हेही वाचा : दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द, शिक्षण विभागाचा एसएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

दरम्यान, संचारबंदीमध्ये शिक्षकांना विशेष सवलत देण्यात आली आहे. त्यासाठी पोलिसांकडून शिक्षकांना ऑनलाइन पास मिळणार आहे. आतापर्यंत बारावीच्या 80 टक्के, तर दहावीच्या 70 ते 80 टक्के उत्तरपत्रिका तपासून झाल्या आहेत. इतिहास विषय वगळता बहुतांश विषयांच्या उत्तरपत्रिका तपासण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती बोर्डाचे सचिव बबन दहिफळे यांनी दिली. बोर्ड सचिवांकडून काल परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. समीक्षकांची कामे लवकर आटोपण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (SSC HSC Exam Result may delay)

एसएससीचा इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्यात आला आहे. ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव आणि  लॉकडाऊन वाढवल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. 21 मार्चला इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयाचा पेपर झाला होता, मात्र 23 मार्चला नियोजित भूगोलाचा पेपर पुढे ढकलण्यात आला होता.

यासोबतच नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. आधीचे सरासरी मार्क लक्षात घेत संबंधित विद्यार्थ्यांना गुण दिले जाणार आहेत.