कोरोनाबाबत काय उपाययोजना? महाराष्ट्र-दिल्लीकडे सर्वोच्च न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्राची मागणी

| Updated on: Nov 23, 2020 | 12:26 PM

दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, आसाम सरकारकडून कोव्हिड19 च्या उपायांबद्दल सर्वोच्च न्यायालयाने प्रतिज्ञापत्र मागितले

कोरोनाबाबत काय उपाययोजना? महाराष्ट्र-दिल्लीकडे सर्वोच्च न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्राची मागणी
Follow us on

नवी दिल्ली : कोव्हिड19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी कोणती पावलं उचलली, काय उपाययोजना करण्याचे नियोजन आखले आहे आणि केंद्र सरकारकडून कोणती मदत आवश्यक आहे, याबाबत स्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना दिले आहेत. नजीकच्या काळात देशभरातील कोव्हिड स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता सुप्रीम कोर्टाने वर्तवली. (Supreme Court asks all the states to file status reports to combat COVID19 situation)

दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि आसाम या राज्यांच्या सरकारकडून कोव्हिड19 च्या सद्यस्थितीबाबत त्यांनी केलेल्या उपायांबद्दल सर्वोच्च न्यायालयाने प्रतिज्ञापत्र मागितले आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने गुजरात आणि दिल्लीमधील कोव्हिडची परिस्थिती बिघडल्याबद्दल ताशेरे ओढले.

सुप्रीम कोर्टाने केंद्र, सर्व राज्यांना कोव्हिड19 च्या सद्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी काय केले, याचा सविस्तर अहवाल दोन दिवसात नोंदवायला सांगितले आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये कोव्हिडची स्थिती बिघडली असून हाताबाहेर जात आहे, असेही न्यायालयाने सुनावले.

देशभरात कालच्या दिवसात कोरोनाचे 44 हजार 059 नवे रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या 91.39 लाखांवर पोहोचली आहे. आतापर्यंत भारतात 1.33 लाख रुग्णांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या 24 तासात देशात 500 हून अधिक कोरोनाबळी गेले. भारतात सध्या 4 लाख 43 हजार 486 कोरोनाग्रस्त आहेत.

पंतप्रधान मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी उद्या संवाद साधणार आहेत. 24 नोव्हेंबरला सकाळी 10 व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहेत. ही बैठक 2 टप्प्यांमध्ये होईल. ज्या राज्यातील कोरोना केसेसची संख्या जास्त आहे, त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान सर्वात आधी संवाद साधतील. म्हणजेच पहिल्या टप्प्यातील बैठकीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित असतील.

संबंधित बातम्या :

कोरोनाने चिंता वाढवली, पंतप्रधान मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा

कोरोना गेलेला नाही, आपण धोक्याच्या वळणावर, स्वयंशिस्त पाळा; मुख्यमंत्र्यांच्या आवाहनातील पाच महत्त्वाचे मुद्दे

(Supreme Court asks all the states to file status reports to combat COVID19 situation)