अखेरची भाऊबीज! शहीद ऋषिकेश जोंधळेंना बहिणीने ओवाळले, शोकाकुल वातावरणात निरोप

| Updated on: Nov 16, 2020 | 12:53 PM

पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात वीरमरण आलेले महाराष्ट्राचे सुपुत्र ऋषिकेश जोंधळे यांच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. (Thousands attend funeral of martyr Rishikesh Jondhale at kolhapur)

अखेरची भाऊबीज! शहीद ऋषिकेश जोंधळेंना बहिणीने ओवाळले, शोकाकुल वातावरणात निरोप
Follow us on

कोल्हापूर : पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात वीरमरण आलेले महाराष्ट्राचे सुपुत्र ऋषिकेश जोंधळे यांच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारापूर्वी जोंधळे यांच्या बहिणीने त्यांना अखेरचं ओवाळलं. त्यावेळी अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या हजारो नागरिकांना अश्रू अनावर झाले होते. (Thousands attend funeral of martyr Rishikesh Jondhale at kolhapur)

शुक्रवारी पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या चकमकीत ऋषिकेश जोंधळे यांना वीरमरण आले होते. त्यानंतर आज फुलांनी सजवलेल्या लष्कराच्या वाहनातून जोंधळे यांचे पार्थिव त्यांच्या गावी बहिरेवाडी येथे आणण्यात आले. जोंधळे यांचे पार्थिव काही काळ त्यांच्या घराजवळ ठेवण्यात आले. जोंधळे यांचं पार्थिव गावात येताच त्यांच्या आई आणि बहिणीने एकच हंबरडा फोडला. त्यामुळे अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाही. जोंधळे यांच्या आईचे तर रडूनरडून हाल झाले होते. जोंधळे यांच्या वडिलांनाही भोवळ आल्याने इतर जवानांनी त्यांना आधार सावरले. जोंधळे यांची अंत्ययात्रा निघण्यापूर्वी त्यांच्या बहिणीने त्यांना अखेरचं ओवाळलं. तेव्हा तर सर्वांच्याच डोळ्यातून अश्रू ओघळत होते. त्यानंतर ‘अमर रहे, अमर रहे… ऋषिकेश जोंधळे अमर रहे,’ ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, अशा घोषणा देत जोंधळे यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीत आली. यावेळी पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी जोंधळे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी गर्दी केली होती.

त्यानंतर पोलीस आणि लष्कराच्या जवानांनी बंदुकीच्या प्रत्येकी दोन फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर त्यांच्या पार्थिवाला अग्नि देण्यात आला. जोंधळे यांच्या पार्थिवाला अग्नि देताच त्याच्या कुटुंबीयांनी पुन्हा जोरजोरात हंबरडा फोडला. त्यामुळे उपस्थितांच्या मनातही कालवाकालव झाली आणि त्यांनीही अश्रूला वाट मोकळी करून दिली.

अवघ्या 20 व्या वर्षी वीरमरण
ऋषिकेश जोंधळे दोन वर्षांपूर्वी बेळगावमध्ये सैन्यात भरती झाले होते. ते भरती झाल्यापासून जम्मू-काश्मीर येथे सेवा बजावत होते. जोंधळे पुँछ जिल्ह्याच्या सवजियान येथे सीमाभागात तैनात होते. पाक सैन्याकडून शुक्रवारी (13 नोव्हेंबर) पहाटेपासून वारंवार शस्त्रीसंधीचं उल्लंघन केलं जात होतं. पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबाराला उत्तर देताना ऋषिकेश गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराठी हेलिकॉप्टरमधून सैन्याच्या दावाखान्यात नेत असताना त्यांचं निधन झालं. (Today sister of martyred jawan Rishikesh Jondhale will celebrate last bhaubeej)

पाकिस्तानकडून सीमाभागात वारंवार गोळीबार सुरु होता. भारतीय जवानांनीदेखील त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र, या गोळीबारात अवघ्या 20 वर्षांचे महाराष्ट्राचे सुपुत्र ऋषिकेश जोंधळे शहीद झाले. जोंधळे शहीद झाल्याची बातमी बहिरेवाडीच्या गावकऱ्यांना संध्याकाळी समजली. त्यानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली.

संपूर्ण गावावर शोककळा
जोंधळे यांना वीरमरण आल्यानंतर त्यांचं पार्थिव कधी गावी परतणार यासाठी संपूर्ण कोल्हापूर वाट पाहत होतं. अखेर आज 4 दिवसांनी त्यांचं पार्थिव गावी दाखल झालं आहे. यावेळी ‘भारत माता की जय’ आणि ‘वीर जवान अमर रहे’ अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर जोंधळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.

इतर बातम्या – 

वीर जवान अमर रहे! शहीद जवान ऋषिकेश जोंधळेंचं पार्थिव मूळ गावी दाखल, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Kolhapur | भारत-पाकमध्ये धुमश्चक्री, कोल्हापूर जिल्ह्यातील ऋषिकेश जोंधळे यांना वीरमरण

(Thousands attend funeral of martyr Rishikesh Jondhale at kolhapur)