Health | मनुष्य जीवनाशी निगडीत ‘या’ गोष्टी जाणून घ्या आणि तणावमुक्त, सकारात्मक आयुष्य जगा!

| Updated on: Nov 17, 2020 | 5:28 PM

आता जवळपास सगळे सण साजरे करून झाले असल्याने, आपल्याला आता तब्येतीकडे थोडे लक्ष द्यावे लागणार आहे.

Health | मनुष्य जीवनाशी निगडीत ‘या’ गोष्टी जाणून घ्या आणि तणावमुक्त, सकारात्मक आयुष्य जगा!
Follow us on

मुंबई : सणांच्या कालावधीमध्ये सगळ्यांचेच स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होते. या काळात कसलाही विचार न करता आपण खुशाल गोड आणि चमचमीत पदार्थांचे सेवन करतो. सणांच्या दिवसांत गोडधोड जेवण हा भारतीय असण्याचा एक सगळ्यात मोठा फायदा आहे. सणांच्या काळात केवळ भारतातच अगणित पदार्थांचा लाभ घेण्याची संधी मिळत असते. तर, आता जवळपास सगळे सण साजरे करून झाले असल्याने, आपल्याला आता तब्येतीकडे थोडे लक्ष द्यावे लागणार आहे (Tips For Stress Free And Positive Life).

सणासुदीच्या काळात थकलेल्या शरीराला आणि मनाला, दोघांनाही विश्रांतीची गरज असते. अशावेळी तणावमुक्त आणि सकारात्मक आयुष्य जगण्यासाठी काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते.

भरपूर पाणी प्या

आपण नेहमीच ऐकत आलो आहोत की पाणी हे आपल्या निरोगी जीवनासाठी लाभदायक आहे. परंतु, केवळ पाणी द्रव पदार्थ म्हणून न पिता, आपण ‘डेटॉक्स वॉटर’ म्हणून देखील रोज नियमाने पिऊ शकतो. ‘डेटॉक्स वॉटर’ तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी किंवा दिवसभरात कधीही पिऊ शकता. ‘डेटॉक्स वॉटर’ तयार करण्यासाठी काकडीचे काप पाण्यात घालून ठेवा. या पाण्यात लिंबाचा रस आणि पुदीन्याची पाने मिसळा. थोड्याथोड्यावेळाने हे पाणी पीत रहा. त्यामुळे तुमची ब्लोटिंग म्हणजेच गॅस तयार होण्याची समस्या कमी होईल. शिवाय शरीराला थंडावा मिळून दिवस भर उत्साही राहता येईल.

पुरेशी झोप घ्या

चांगली आणि पुरेशी झोप शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे. आजकाल आपण दिनक्रमात आपण इतके व्यस्त होत चाललो आहोत की स्वतःला शांतीचे दोन क्षणसुद्धा आपण देऊ शकत नाही. मानवी शरीराला कमीत कमी 6 ते 8 तासांची झोप आवश्यक असते. पुरेशी झोप न मिळाल्याने स्मरणशक्ती कमी होणे, थकवा जाणवणे तसेच एकाग्रता कमी होणे अशा समस्या निर्माण होतात. म्हणूनच, झोप पूर्ण करण्याची संधी कधी दवडू नका (Tips For Stress Free And Positive Life).

आपले विचार कागदावर लिहा

नवीन तंत्रज्ञानामुळे आपण पेन आणि कागदापेक्षा की बोर्डने जास्त लिहायला लागलो आहोत. परंतु, कागदावर आपले विचार उमटवण्याचे काही वेगळेच फायदे आहेत. दिवस संपल्यानंतर आपले विचार एका कागदावर नक्की लिहा. जे आपण पूर्ण दिवसात शिकलो आहोत आणि जे आपल्याला दुसऱ्या दिवशी शिकायचे आहे, ते नक्कीच एके ठिकाणी लिहून ठेवा. त्यामुळे तुमची स्मरणशक्तीची तल्लख होईल, तसेच हातांचे स्नायू सक्रिय राहतील.

चालत राहा

रोज नियमित ठरवून चालले पाहिजे. चालताना मन दुसऱ्या कामांमध्ये न गुंतवता, अथवा इतर कुठल्याही विचारात गढून न राहता फक्त चालत राहिले पाहिजे. चालण्याच्या व्यायामामुळे फुप्फुसांची क्षमता वाढते, मनस्थिती सुधारते, प्रतिकारशक्ती वाढते, अन्न पचन करण्याच्या क्रियेत वाढ होते, मधुमेहाचा धोका कमी होतो, स्मरणशक्ती तल्लख होते, असे अनेक फायदे आहेत. म्हणूनच तंदुरुस्त आणि निरोगी शरीरासाठी चालण्याचा व्यायाम केलाच पाहिजे.

(Tips For Stress Free And Positive Life)