Corona | देशभरात टीव्ही मालिका-चित्रपटांचं शूटिंग 31 मार्चपर्यंत बंद

| Updated on: Mar 15, 2020 | 6:19 PM

31 मार्चपर्यंत देशभरातील सर्व टीव्ही मालिका, चित्रपट, वेब सीरिज यासारख्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं चित्रीकरण बंद ठेवण्यात येणार आहे TV Serial Films shooting to halt

Corona | देशभरात टीव्ही मालिका-चित्रपटांचं शूटिंग 31 मार्चपर्यंत बंद
Follow us on

मुंबई : ‘कोरोना’ व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वतोपरी उपाय आखले जात आहेत. राज्यभरातील थिएटर आणि नाट्यगृह मार्चअखेरपर्यंत बंद करण्याचा निर्णय झाल्यानंतर आता टीव्ही मालिका-चित्रपटांचं शूटिंगही बंद करण्यात येणार आहे. (TV Serial Films shooting to halt)

19 मार्च म्हणजेच येत्या गुरुवारपासून 31 मार्चपर्यंत देशभरातील सर्व टीव्ही मालिका, चित्रपट, वेब सीरिज यासारख्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं चित्रीकरण बंद ठेवण्यात येणार आहे. ‘कोरोना’ व्हायरसमुळे भारत सरकारने वैद्यकीय आणीबाणी जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

Corona Care and Locked Down | लॉक डाऊन म्हणजे नेमकं काय?

‘इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर असोसिएशन (इम्पा), फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज आणि इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन’च्या बैठकीत एकमताने याबाबत ठराव मंजूर करण्यात आला. कोरोना विषाणूशी दोन हात करण्यासाठी केंद्राने घेतलेल्या निर्णयांना आमचा पाठिंबा आहे, असंही पत्रकात जाहीर करण्यात आलं.

मालिका-चित्रपटांचं शूटिंग थांबेपर्यंत सेटवर सर्व काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 30 मार्चला परिस्थिती पाहून चित्रीकरण पुन्हा सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

मुंबईसह महाराष्ट्रातील शाळा-महाविद्यालयांसोबतच व्यायामशाळा (जिम), जलतरण तलाव (स्विमिंग पूल) सिनेमागृह, नाट्यगृह, शॉपिंग मॉल्स 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आर्थिक राजधानी मुंबईत कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबईतून राज्यात, देशात किंवा परदेशात कोणत्याही प्रकारचे सामूहिक पर्यटन आयोजित करता येणार नाही.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी भारताने पाकिस्तान, भूतान, बांगलादेश, म्यानमार आणि नेपाळच्या सीमा सील केल्या आहेत. सीमेवरील प्रवासी वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. भारताने याआधीच उच्चपदस्थ अधिकारी वगळता परदेशी नागरिकांचे व्हिसा 15 एप्रिलपर्यंत रद्द करुन त्यांना भारतात प्रवेशबंदी केली आहे.

TV Serial Films shooting to halt