वाद निर्माण झालेल्या UPSC च्या या प्रश्नाबद्दल IAS आणि परीक्षार्थींना काय वाटतं?

| Updated on: Sep 23, 2019 | 6:29 PM

हा प्रश्न मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर क्रमांक एकमध्ये विचारण्यात आला. यावर अनेकांनी सोशल मीडियावर प्रश्नपत्रिका शेअर करत यूपीएससीवर आक्षेप घेतला, तर काहींनी प्रश्नाचं समर्थनही केलं.

वाद निर्माण झालेल्या UPSC च्या या प्रश्नाबद्दल IAS आणि परीक्षार्थींना काय वाटतं?
Follow us on

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा मुख्य परीक्षेतील (UPSC Mains GS Paper 1) एका प्रश्नामुळे नवा वाद निर्माण झालाय. मुख्य परीक्षा 20 सप्टेंबरला सुरु झाली असून 29 सप्टेंबरला अखेरचा पेपर होणार आहे. “धर्मनिरपेक्षतेच्या नावावर आपल्या संस्कृतिक प्रथांसमोर कोणकोणती आव्हाने आहेत?” हा प्रश्न मुख्य परीक्षेतील (UPSC Mains GS Paper 1) सामान्य अध्ययन पेपर क्रमांक एकमध्ये विचारण्यात आला. यावर अनेकांनी सोशल मीडियावर प्रश्नपत्रिका शेअर करत यूपीएससीवर आक्षेप घेतला, तर काहींनी प्रश्नाचं समर्थनही केलं.

यूपीएससीकडून कायम चालू घडामोडींशी संबंधित प्रश्न अभ्यासक्रमाला जोडून विचारले जातात. गेल्या काही दिवसांपासून देशात सुरु असलेल्या राजकीय, सामाजिक परिस्थितीला विचारुन याहीवेळी प्रश्न विचारण्यात आले. पण यातील धर्मनिरपेक्षतेच्या प्रश्नावर काहींनी आक्षेप घेतला. या प्रश्नाचं उत्तर 150 शब्दांमध्ये 10 गुणांसाठी लिहायचं होतं.

“प्रश्नात काही वादग्रस्त वाटलं नाही”

मुख्य परीक्षा दिलेल्या एका परीक्षार्थीने सांगितलं की, “आमच्यासाठी इतर प्रश्नांसारखाच हा प्रश्न होता. तुम्हाला फक्त पाच ते सात मिनिटात उत्तर पूर्ण करायचं असतं, कारण प्रश्नपत्रिकेत एकूण 20 प्रश्न असतात. मी ट्रिपल तलाक, यूएपीए कायदा यांसारखी चार ते पाच उदाहरणे लिहिली. भारतामध्ये विविध संस्कृती आहेत आणि त्याचा आदर करणं गरजेचं आहे. पण काही संस्कृतिक प्रथांच्या नावाखाली चुकीच्या गोष्टीही होत असतात. त्यामुळे अशा वेळी सुप्रीम कोर्टाच्या निकालांचाही दाखला देता येऊ शकतो.”

मुख्य परीक्षा दिलेल्या आणखी एक परीक्षार्थीने सांगितलं की, “या प्रश्नाला वेगवेगळी उदाहरणे देता येऊ शकतात. विविध संस्कतींमध्ये भेदभाव होण्याची दाट शक्यता असते. सकाळी उठून मंदिरात पूजा करणाऱ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो, तर दिवसात पाच वेळा नमाज पठण करणाऱ्याकडेही पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. पण या प्रश्नामुळे वाद निर्माण होण्याचं कारण नाही. कारण, धर्मनिरपेक्षता कधीही चांगली आहे. धर्मनिरपेक्षतेचेही अनेक प्रकार आहेत. कम्युनिस्टांची धर्मनिरपेक्षता वेगळी असते, ते देवाला मानतच नाहीत. आपल्याकडे सहिष्णू असणं म्हणजेच धर्मनिरपेक्षता मानली जाते.”

“परीक्षार्थीची सामाजिक जागृती तपासणारा प्रश्न”

Lal Bahadur Shastri National Academy of Administration Mussoorie (LBSNAA) मध्ये आयएएस प्रशिक्षणार्थी आणि गेल्या वर्षीचे यशस्वी उमेदवार रियाज सय्यद यांच्या मते, “वाद निर्माण करण्यासारखं काहीही नाही. यूपीएससीला हा प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य आहे. उमेदवाराची बौद्धिक चाचणी करण्यासाठी, समाजातील घडामोडींबाबत तो किती जागरूक आहे हे पाहण्यासाठी हे प्रश्न असतात. आपल्याकडे संस्कृतीच्या नावाखाली अशा काही प्रथा आहेत, ज्यात माणसांचे जीवही घेतले जातात. स्वतः सुप्रीम कोर्टाकडूनही यावर बंदी घातली जाते. शिवाय धर्मनिरपेक्षता हे सकारात्मक मूल्य असून आपल्या राज्यघटनेतही त्याचा उल्लेख आहे. चालू घडामोडींशी संबंधित हा प्रश्न होता, ज्यात परीक्षार्थींना समतोल साधणारं उत्तर लिहून चांगले गुण घेण्याची संधी होती.”

दरम्यान, सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्यानंतर नुकतेच राजीनामा दिलेले आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन यांनीही यावर भाष्य केलं. गोपीनाथन म्हणाले, “भारतीय धर्मनिरपेक्षता ही एक सकारात्मक संकल्पना आहे. अंधश्रद्धा आणि हानिकारक प्रथांविरूद्ध विज्ञान उंचावत असताना सर्व धर्मनिरपेक्षता संस्कृतिक पद्धतींचा आधार घेत त्यांना प्रोत्साहित करते, असं माझ्या उत्तराचं पहिलं वाक्य असतं.”