‘निवार’ची झळ सोसत असताना तामिळनाडूवर पुन्हा संकटाचं सावट, आणखी एक भयावह चक्रीवादळ धडकण्याची शक्यता

| Updated on: Nov 30, 2020 | 8:56 PM

चक्रीवादाळामुळे तामिळनाडू आणि केरळमधील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे (Weather Department alert Tamil nadu another storm after cyclone Nivar).

निवारची झळ सोसत असताना तामिळनाडूवर पुन्हा संकटाचं सावट, आणखी एक भयावह चक्रीवादळ धडकण्याची शक्यता
Follow us on

चेन्नई : निवार चक्रीवादळाची झळ सोसत असताना तामिळनाडूच्या किनाऱ्यावर पुन्हा आणखी एक भयावह चक्रीवादळ धडकण्याची भीती भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढच्या एक-दोन दिवसात हे चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादाळामुळे तामिळनाडू आणि केरळमधील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे (Weather Department alert Tamil nadu another storm after cyclone Nivar).

बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने समुद्रात चक्रीवादळ घोंघावत आहे. हे चक्रीवादळ 2 डिसेंबरला श्रीलंकेच्या किनारपट्टीवर धडकेल. त्यानंतर ते भारताच्या दिशेला येण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू आणि केरळच्या किनाऱ्या जवळील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची भीती हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे तामिळनाडू आणि केरळच्या काही भागांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुढच्या 24 तासांमध्ये चक्रीवादळाचा वेग प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ 2 डिसेंबरला श्रीलंकेच्या किनारपट्टीवर धडकेल. त्यानंतर वायव्य दिशेला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर 3 डिसेंबरच्या सकाळी हे चक्रीवादळ भारताच्या दिशेला येण्याचा धोका आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे (Weather Department alert Tamil nadu another storm after cyclone Nivar).

‘निवार’मुळे तामिळनाडूत हाहा:कार

तामिळनाडू आणि पद्दुचेरीत गेल्या आठवड्यात निवार नावाचं भयानक चक्रीवादळ आलं होतं. या चक्रीवादळामुळे अनेक भागांमध्ये प्रचंड मुसळधार पाऊस पडला होता. अनेक भगांमध्ये पाणी साचलं होतं. या नैसर्गिक आपत्तीत तीन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर तीन नागरिक जखमी झाले.

निवार चक्रीवादळामुळे 26 गुरे-ढोरेंचा बळी गेला. तर 101 घरे नेस्ताबूत झाले होते. जवळपास 380 झाडं पडले. 14 एकर केळीच्या बागेचं नुकसान झालं. विशेष म्हणजे चक्रीवादळ येण्याआधी प्रशासनाने जवळपास एक लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं होतं. चक्रीवादळानंतरही प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड मदत केली. मात्र, या चक्रीवादळाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले.

हेही वाचा : मंगळवारपासून संपूर्ण महिनाभर क्षय आणि कुष्ठरुग्ण संयुक्त शोध अभियान, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती