नवरा आंघोळ, दाढी करत नसल्याने घटस्फोटासाठी अर्ज

| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

भोपाळ (मध्य प्रदेश) : नवरा-बायको म्हटलं तर काही ना काही कारणांवरुन वाद होत असतात. नवरा-बायकोमध्ये होणारे वाद, मारहाण, सततची भांडणं यांसारख्या अनेक कारणांमुळे घटस्फोट झाल्याच्या घटना सातत्याने उघडकीस येतात. मात्र मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये राहणाऱ्या एका महिलेने नवरा आंघोळ करत नाही, या कारणामुळे घटस्फोट घेण्यासाठी अर्ज केला आहे. या अनोख्या कारणामुळे सध्या जोडप्याची सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा […]

नवरा आंघोळ, दाढी करत नसल्याने घटस्फोटासाठी अर्ज
Follow us on

भोपाळ (मध्य प्रदेश) : नवरा-बायको म्हटलं तर काही ना काही कारणांवरुन वाद होत असतात. नवरा-बायकोमध्ये होणारे वाद, मारहाण, सततची भांडणं यांसारख्या अनेक कारणांमुळे घटस्फोट झाल्याच्या घटना सातत्याने उघडकीस येतात. मात्र मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये राहणाऱ्या एका महिलेने नवरा आंघोळ करत नाही, या कारणामुळे घटस्फोट घेण्यासाठी अर्ज केला आहे. या अनोख्या कारणामुळे सध्या जोडप्याची सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा रंगली आहे.

भोपाळमधील या जोडप्याचं लग्न 2018 मध्ये झाले. लग्नावेळी तरुणाचं वय 25 तर तरुणी 23 वर्षांची होती. त्यांचं अरेंज मॅरेज असून मुलगा सिंधी, तर मुलगी ब्राह्मण आहे. लग्न झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस त्या दोघांचाही सुखाचा संसार सुरु होता. मात्र काही महिन्यांपूर्वी विवाहितेला आपला नवरा आंघोळ करत नसल्याचे समजले. त्यानंतर तिने त्याला अनेकदा आंघोळ करण्यास बजावलं. मात्र तो विविध कारणं सांगत आंघोळ करण्यास टाळाटाळ करत होता. त्यानंतर त्या दोघांमध्ये या विषयांवरुन टोकाचे वाद निर्माण झाले. या वादानंतर मुलीने कंटाळून भोपाळच्या कौटुंबीक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला.

गेल्या काही दिवसांपासून कौटुंबीक न्यायालयासमोर त्या दोघांनी आपपल्या बाजू मांडल्या. नवरा अंघोळ करत नसल्याने त्याच्या शरीरातून दुर्गंधी येते असं कारण बायकोने न्यायाधीशांसमोर दिलं. तसेच त्याला आंघोळ करायला सांगितले, तर तो कपड्यांवर परफ्युम लावतो आणि बाहेर येतो. त्याच्या या आंघोळ न करण्याच्या सवयीला मी कंटाळले आहे. इतकेच नाही तर तो घरी आल्यानंतर सर्व वस्तू कुठेही पसरवून ठेवतो. विशेष म्हणजे तो कित्येक महिने दाढीही करत नाही. त्यामुळे मला माझ्या नवऱ्यापासून घटस्फोट हवा आहे, असं तिने न्यायाधीशांसमोर सांगितलं.

यावर मुलाच्या आई-वडिलांनी सून खोटं सांगत असल्याचा दावा केला. आमच्या मुलाशी लग्न केल्यानंतर तिला आमच्या घरातील परंपरा, खाणे-पिणे या सर्व गोष्टी कित्येकदा सांगून समजत नव्हत्या. त्यामुळे तिला आमच्या घरात राहण्यास त्रास होत होता. म्हणूनच तिला आमच्या मुलापासून घटस्फोट हवा आहे, असा आरोप मुलाच्या आई-वडिलांनी केला.

भोपाळच्या कौटुंबीक न्यायालयातील न्यायधीशांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. त्यानंतर त्यांनी त्या दोघांना तुम्हाला घटस्फोट हवा असल्यास 6 महिने वेगळे राहावे लागेल आणि त्यानंतरच तुमचा कायद्याने घटस्फोट होईल असे सांगितले.