महिलांच्या ५ शारीरिक आणि मानसिक बाबी, ज्या आजही पुरुषांना माहिती नाहीत, नाते टीकवण्यासाठी अत्यंत महत्वाच्या
अनेक महिला नात्यात विश्वास, आदर आणि स्थिरता शोधतात. त्यांना असा साथीदार हवा असतो जो केवळ आनंदाच्या क्षणी नाही तर अडचणीच्या काळातही त्यांची साथ देईल. चुका झाल्या तरी एकमेकांवर दोषारोप करण्याऐवजी संवाद साधणे नात्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. पुरुषांनी महिलांच्या भावनांना "ओव्हर रिएक्शन " म्हणून न पाहता त्यामागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

नाते फक्त प्रेमाच्या भावनेवर टिकत नाही, तर एकमेकांना समजून घेण्याच्या क्षमतेवर टिकते. अनेक पुरुषांना असे वाटते की त्यांनी कुटुंबासाठी मेहनत केली, आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडल्या किंवा आपल्या जोडीदाराच्या गरजा पूर्ण केल्या म्हणजे ते एक चांगले साथीदार आहेत. हे निश्चितच महत्त्वाचे आहे, पण अनेक महिलांसाठी नात्यातील खरी गरज केवळ सुविधा किंवा सुरक्षितता नसते; त्यांना भावनिक आधार, आपलेपणा आणि आपल्याला कोणी मनापासून समजून घेत आहे अशी भावना हवी असते. अनेक वेळा महिला एखादी समस्या सांगतात तेव्हा त्यांचा उद्देश लगेच उपाय मिळवणे नसतो. त्यांना आधी आपले मन मोकळे करायचे असते. त्यांना कोणीतरी शांतपणे ऐकावे, त्यांच्या भावनांना महत्त्व द्यावे आणि “तुला असे का वाटते?” असे विचारून त्यांच्या अनुभवाला समजून घ्यावे असे वाटते.
स्वतःसाठी फार कमी वेळ मिळतो
मात्र अनेक पुरुष समस्येचे निराकरण करण्याच्या भूमिकेत जातात. ते लगेच सल्ला देतात किंवा परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतात. पण काही वेळा महिलांना उपायापेक्षा सोबत आणि सहानुभूतीची गरज असते. नात्यातील संवाद हा केवळ बोलण्यापुरता मर्यादित नसतो. समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर करणे, तिच्या शांततेमागचे कारण समजून घेणे आणि तिच्या छोट्या-छोट्या प्रयत्नांची दखल घेणे हे देखील प्रेम व्यक्त करण्याचे मार्ग आहेत. अनेक महिला दिवसभर अनेक भूमिका पार पाडत असतात पत्नी, आई, मुलगी, सून, कर्मचारी किंवा घरातील जबाबदार व्यक्ती. या सर्व भूमिकांमध्ये त्यांना स्वतःसाठी फार कमी वेळ मिळतो. अशा वेळी जोडीदाराकडून मिळणारी छोटीशी प्रशंसा किंवा आधार त्यांच्यासाठी खूप मोठा असतो.
तिला कधी एक कप चहा करुन द्या…
काही पुरुषांना वाटते की महिला खूप अपेक्षा ठेवतात, परंतु अनेकदा त्यांची अपेक्षा साधी असते “माझा साथीदाराने मला समजून घ्यावे.” नात्यातील जवळीक ही मोठ्या भेटवस्तूंनी किंवा महागड्या गोष्टींनी निर्माण होत नाही; ती रोजच्या छोट्या कृतींमधून तयार होते. एक कप चहा करून देणे, थकवा जाणून घेणे, तिच्या कामाचे कौतुक करणे किंवा काही वेळ फक्त तिच्यासोबत शांत बसणे आदी कृतीतून भावनिक नाते मजबूत होत असते. घरातील काम म्हणजे फक्त स्वयंपाक, साफसफाई किंवा मुलांची काळजी घेणे एवढेच नसते.
अनेक महिलांच्या मनात सतत अनेक गोष्टींचे नियोजन सुरू असते. घरातील कोणाला काय हवे आहे, मुलांची शाळा, डॉक्टरांची भेट, घरातील सामान, कुटुंबातील सदस्यांच्या गरजा, सण-समारंभाची तयारी आणि भविष्यातील अनेक योजना या सर्व गोष्टींचा विचार अनेकदा महिला सतत करत असतात. यालाच मानसिक भार किंवा “मेंटल लोड” असे म्हटले जाते. हा भार दिसत नसल्यामुळे अनेकदा त्याचे महत्त्व कमी केले जाते. एखाद्या व्यक्तीने दिवसभर घरातील कामे केली नाहीत तरी तिचे मन सतत जबाबदाऱ्यांनी व्यापलेले असू शकते.
त्यांना पूर्णपणे आराम करता येत नाही
काही महिला कार्यालयात काम करून घरी आल्यानंतरही कुटुंबाच्या गरजांकडे लक्ष देतात. त्यांना विश्रांती घेण्याची इच्छा असते, पण मनातील जबाबदाऱ्यांमुळे त्यांना पूर्णपणे आराम करता येत नाही. अनेक नात्यांमध्ये समस्या तेव्हा निर्माण होतात जेव्हा एका व्यक्तीला वाटते की ती सर्व काही एकटी सांभाळत आहे. पुरुषांनी केवळ सांगितल्यावर काम करण्याऐवजी स्वतःहून जबाबदाऱ्या ओळखणे गरजेचे आहे. “काय मदत करू?” हा प्रश्न चांगला आहे, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे परिस्थिती समजून घेऊन स्वतःहून पुढाकार घेणे.
घर ही दोघांची जबाबदारी आहे. मुलांचे संगोपन, घरातील निर्णय आणि भावनिक वातावरण तयार करणे यामध्ये दोघांचाही सहभाग असणे आवश्यक आहे. जेव्हा जबाबदाऱ्या समानपणे वाटल्या जातात तेव्हा महिलांवरील ताण कमी होतो आणि नात्यात अधिक आनंद निर्माण होतो. मानसिक भार कमी करण्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे. जोडीदारांनी एकमेकांशी प्रामाणिकपणे बोलले पाहिजे. “तुला काय त्रास होतो आहे?” “मी तुला कशाप्रकारे साथ देऊ शकतो?” असे प्रश्न नात्यातील अंतर कमी करू शकतात.
त्यांच्या भावनांची खिल्ली उडवणे योग्य नाही…
महिलांच्या आयुष्यात अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. मासिक पाळी, गर्भधारणा, प्रसूतीनंतरचा काळ आणि रजोनिवृत्ती या प्रत्येक टप्प्यावर शरीरात वेगवेगळे बदल होतात. या बदलांचा परिणाम केवळ शरीरावर होत नाही, तर भावनांवर आणि मानसिक स्थितीवरही होऊ शकतो. काही वेळा महिलांच्या मनःस्थितीत बदल होतात, त्या अधिक संवेदनशील होतात किंवा त्यांना थकवा जाणवतो. अशा वेळी त्यांच्या भावनांची खिल्ली उडवणे किंवा त्यांना “तू जास्त विचार करतेस” असे म्हणणे योग्य नाही.
आधार देणे आवश्यक
त्याऐवजी त्यांना समजून घेणे आणि आधार देणे आवश्यक आहे. विशेषतः गर्भधारणा आणि प्रसूतीनंतरचा काळ महिलांसाठी खूप मोठा बदल घेऊन येतो. आई झाल्यानंतर तिच्या आयुष्यातील प्राधान्यक्रम बदलतात. झोपेची कमतरता, मुलाची काळजी, शरीरातील बदल आणि नवीन जबाबदाऱ्या यामुळे ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकू शकते. या काळात जोडीदाराची साथ तिच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते.
महिलांना नेहमीच मजबूत दिसण्याची अपेक्षा केली जाते. पण प्रत्येक मजबूत व्यक्तीलाही कधीतरी आधाराची गरज असते. तिच्या भावनांना कमकुवतपणा समजण्याऐवजी त्या तिच्या मानवी अनुभवाचा भाग आहेत हे स्वीकारणे गरजेचे आहे. जोडीदाराने तिच्या आरोग्याबद्दल, भावनांबद्दल आणि बदलांबद्दल संवेदनशील असणे हे प्रेमाचे लक्षण आहे. समजूतदारपणा आणि संयम यामुळे नाते अधिक विश्वासपूर्ण बनते. आई होणे हा अनेक महिलांच्या आयुष्यातील सुंदर अनुभव असतो, पण त्यासोबत अनेक नवीन आव्हानेही येतात.
“मॉम गिल्ट” मुळे महिलांची द्विधा अवस्था
मुलांची काळजी घेताना अनेक महिला स्वतःच्या गरजा मागे ठेवतात. त्यांना सतत प्रश्न पडतो की आपण मुलांसाठी पुरेसे करत आहोत का? आपल्याकडून काही चूक तर होत नाही ना? या भावनेला अनेकदा “मॉम गिल्ट” असे म्हटले जाते. नोकरी करणाऱ्या महिलांना अनेकदा करिअर आणि कुटुंब यामध्ये समतोल साधण्याचा संघर्ष करावा लागतो. कामावर लक्ष दिले तर मुलांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना निर्माण होऊ शकते आणि मुलांना वेळ दिला तर करिअरमध्ये मागे पडण्याची चिंता वाटू शकते. घर सांभाळणाऱ्या महिलांनाही त्यांच्या कामाची किंमत ओळखली जावी अशी अपेक्षा असते.
यामुळे कुटुंबातील वातावरण अधिक आनंदी होते
आईच्या भूमिकेत महिला अनेकदा स्वतःच्या इच्छा, छंद आणि विश्रांती यांना मागे ठेवतात. त्यामुळे जोडीदाराने तिच्या प्रयत्नांची दखल घेणे आवश्यक आहे. “तू किती काम करतेस हे मला दिसते” एवढे साधे वाक्यही तिच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरू शकते. मुलांची जबाबदारी ही फक्त आईची नसते. वडिलांचा सक्रिय सहभाग मुलांच्या विकासासाठी आणि आईच्या मानसिक आरोग्यासाठीही महत्त्वाचा असतो. मुलांसोबत वेळ घालवणे, त्यांच्या गरजा समजून घेणे आणि घरातील कामांमध्ये सहभागी होणे यामुळे कुटुंबातील वातावरण अधिक आनंदी होते.
स्वतःची काळजी घेणे आवश्यक
महिलांनीही स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. स्वतःसाठी वेळ काढणे म्हणजे स्वार्थीपणा नाही. मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी स्वतःच्या गरजांना महत्त्व देणे गरजेचे आहे. कोणत्याही नात्यात भावनिक सुरक्षितता ही अत्यंत महत्त्वाची असते. भावनिक सुरक्षितता म्हणजे आपल्या भावना व्यक्त करताना भीती वाटू नये, आपले मत मांडताना आपला अपमान होणार नाही याची खात्री असणे आणि कठीण काळात जोडीदार आपल्यासोबत उभा राहील असा विश्वास असणे.