विकेंडला जंजिऱ्याला जाण्याचा प्लॅन करताय, थांबा आधी ही बातमी वाचा!

| Updated on: Dec 23, 2020 | 12:01 PM

या विकेंडला मुंबईपासून जवळ असलेल्या जंजिरा किल्ल्यावर फिरण्याचे आयोजन करत असाल, तर थांबा!

विकेंडला जंजिऱ्याला जाण्याचा प्लॅन करताय, थांबा आधी ही बातमी वाचा!
Follow us on

मुंबई : विकेंड जवळ आला की लगेचच फिरण्याचे प्लॅन बनवले जातात. या विकेंडला मुंबईपासून जवळ असलेल्या जंजिरा किल्ल्यावर फिरण्याचे आयोजन करत असाल, तर थांबा! कदाचित तुमचा हा प्लॅन वाया जाण्याची शक्यता आहे. जंजिरा किल्ला या आठवड्याच्या अखेरीस पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. आठवड्याच्या शेवटी या किल्ल्यावर होणारी अति गर्दीची परिस्थिती पाहता सध्याच्या कोविड काळातील नियमांनुसार सोशल डिस्टंन्सिगचे नियम पाळणे शक्य होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे, रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले (Janjira For will remain closed on weekends due to overcrowding).

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना पर्यटक किल्ल्यावर सोशल डिस्टंन्सिगचे नियम आणि मास्क वापरत नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते. शनिवार व रविवार दरम्यान किल्ल्यावरील गर्दी व्यवस्थापित करणे अतिशय कठीण होत आहे. तसेच, यावेळी सोशल डिस्टंन्सिग आणि मास्कचे नियम देखील पाळले जात नसल्याने एएसआयने सांगितले.

विकेंडला पर्यटकांची सुमार गर्दी!

मागील रविवारी जंजिरा किल्ल्यावर तब्बल 3000 तिकिटांची विक्री करण्यात आली असल्याचे एएसआय अधिकाऱ्यांनी सांगितले. तर, एका बोटीची मर्यादा केवळ 10 सीट इतकीच असताना, या बोटीत जवळपास 30-35 लोक अवघडून बसले होते. इतकेच नव्हेतर या प्रवाशांकडे लाईफ जॅकेटदेखील नव्हती, असे एएसआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी यासंदर्भात एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, ‘आम्हाला किल्ल्यावरील प्रचंड गर्दीच्या परिस्थितीबद्दल सूचित केले गेले आहे. म्हणूनच या आठवड्याच्या अखेरीस किल्ला पर्यटकांसाठी ते बंद करण्यात येणार आहे. एएसआय माझ्याशी बोलले आणि किल्ल्यावर खूप गर्दी होत असल्याबद्दल मला माहिती दिली. आम्ही यासंदर्भात पोलीस विभाग आणि एएसआयकडून औपचारिक अहवालाची प्रतीक्षा करीत आहोत.’

त्या म्हणाल्या की, बरेच लोक किल्ल्यावर गर्दी करत होते, यामुळे येथे कोरोना संसर्गाचा धोका होता. याशिवाय, सुरक्षेचे नियम डावलून एका बोटीत इतके प्रवाशी बसवणे हे प्रकरण धोकादायक होते. याठिकाणी जेट्टी नाही आणि बोटींमध्ये सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त लोक प्रवास करत आहेत (Janjira For will remain closed on weekends due to overcrowding).

कोरोना प्रतिबंधक नियम धाब्यावर!

संपूर्ण जिल्ह्यात ही समस्या भेडसावत आहे. पुष्कळ लोक या ठिकाणी गर्दी करून, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करत नाहीत. त्यामुळे, लोक मास्क आणि सामाजिक अंतरांचे नियम पाळत आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी आम्ही विविध ठिकाणी पोलीस पथके पाठवण्याचा विचार करत असल्याचे निधी चौधरी म्हणाल्या.

मागील शनिवार व रविवार दरम्यान हजारो पर्यटकांनी वेगवेगळ्या वेळी किल्ल्याला भेट दिली, त्यामुळे प्रचंड गर्दी व सोशल डिस्टंन्सिगचा प्रश्न निर्माण झाला, असे एएसआय अधिकाऱ्यांनी सांगितले. एएसआयकडे किल्ल्यावरील नियोजनासाठी मर्यादित कर्मचारीवर्ग आहे. तसेच, कोरोना संबंधित नियमांचे पर्यटकांकडून पालन होत नसल्याच्या तकारी एएसआय कर्मचार्‍यांकडून वारंवार कानावर येत आहेत. दर शनिवारी आणि रविवारी हीच परिस्थिती उदभवत असल्याचे ते म्हणाले.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची शक्यता आणि ब्रिटन व इतर काही देशांमध्ये कोविडचा नवीप्रकार समोर आल्याने, अशा परिस्थिती ही गर्दी अत्यंत धोकादायक ठरू शकते, अशी भीती देखील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

(Janjira For will remain closed on weekends due to overcrowding)

हेही वाचा :