वेळीच सावध व्हा, अन्यथा या पाच सवयींनी खंगून जाईल संपूर्ण शरीर…

| Updated on: Feb 02, 2022 | 8:48 AM

अनेक वेळा आपल्या नकळत आपल्याच सवयी आपणास घातक ठरत असतात. आपल्या वाईट सवयींचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. बिघडत्या जीवनशैलीमुळे अनेकदा कायमस्वरूपी व्याधी जडत असतात. आपल्या शरीराच्या हाका वेळीच एकल्या नाही, तर नंतर पश्चात्तापाशिवाय काही उरत नाही.

वेळीच सावध व्हा, अन्यथा या पाच सवयींनी खंगून जाईल संपूर्ण शरीर...
आरोग्याची काळजी
Follow us on

‘आरोग्यम्‌ धन संपदा’ हा मूलमंत्र आपणास पहिल्यापासून शिकवण्यात येत असतो. मन व शरीर (body) स्वच्छ ठेवल्यास निरोगी व सुदृढ आयुष्य जगण्यास मदत होत असते. चांगल्या आरोग्यासाठी सर्वप्रथम अंगी चांगल्या सवयी (habits) बाळगणे महत्त्वाचे आहे. सवयीच जर वाईट असतील तर त्यातून चांगले शरीर घडणे अवघड असते. त्यामुळे आरोग्याला घातक असलेल्या सवयी बदलून चांगल्या सवयी अंगीकारणे आवश्यक ठरत असते. आयुर्वेदात निरोगी आरोग्यासह दैनंदिन जीवनात आहार-विहाराबाबतची माहिती दिली आहे. रोज किती झोप घ्यावी, सकाळचा नाश्ता काय असावा, जेवणात कोणकोणत्या पदार्थांचा समावेश असावा, रात्रीचे जेवण केव्हा व कोणते असावे, व्यायाम किती वेळ करावा आदी सर्व आपल्या सवयी ह्या आपल्या शरीरावर परिणाम करीत असतात. त्यामुळे आपल्या शरीरानुसार योग्य आहार व सवयी ठेवल्यास आजार (diseases) आपल्या आसपासदेखील दिसणार नाहीत.

व्यायामाची कमतरता :

बदलती जीवनशैली आणि आता गेल्या अडीच वर्षांपासून कोरोनामुळे आपल्या दैनंदिन जीवनात आमूलाग्र बदल झाला आहे. ‘वर्क फ्रॉम होम’मुळे तर आपल्या रोजच्या क्रियाकलापावर परिणाम झालेला दिसत आहे. हालचाल कमी झाल्याने साहजिकच लठ्ठपणाची समस्या अनेकांना जाणवत आहे. लठ्ठपणासोबतच मधुमेह, उच्चरक्तदाब आदी आजार जडत आहे. तरुण पिढी तर सतत मोबाइल, लॅपटॉपसारख्या गॅझेटच्या आहारी गेली आहे. पुरेसा व्यायाम नसल्याने शरीराला जडपणा आला आहे. त्यामुळे दिवसातून किमान पाऊण तास व्यायाम करावा, चालणे, धावणे आदींवर भर द्यावा.

अपूर्ण झोप :

कंपनीने दिले टार्गेट पूर्ण करायचे, परीक्षेचा अभ्यास करायचा नाहीच तर एखादी पिक्चर बघायचा, सोशल मीडियावर व्यस्त राहणे, पार्टी आदींमुळे अनेक वेळा मध्यरात्रीपर्यंत जागरण होत असते. पुरेशी झोप न झाल्यामुळे त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी आपल्या शरीरावर जाणवत असतो. डोकेदुखी, चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे, अपचन आदी विविध समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आपल्या झोपेचे नियोजन ठरवलं पाहिजे.

अतिरिक्त कॅलरीज्‌चे सेवन :

सणउत्सव किंवा लग्नसमारंभानिमित्त काही वेळा अतिरिक्त गोड पदार्थांचे सेवन केले जात असते. जास्त गोड पदार्थांमध्ये कॅलरीज्‌ही जास्त असतात. त्यामुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होत असते. लठ्ठपणा असला की त्यामागे मधुमेह व उच्चरक्तदाब हे ओघाने येतात. यासह अन्य अनेक संधिसाधू आजारही व्यक्तीला ग्रासू शकतात. त्यामुळे जास्त गोडधोड, जंक फूड, फास्ट फूड सेवन करणे टाळावे.

पाण्याचे अल्पप्रमाण :

शरीरातील विषारी घटक मुत्राव्दारे बाहेर टाकण्यात पाण्याची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे भरपूर प्रमाणात पाणी प्यावे, पाण्यामुळे शरीर हायड्रेड राहण्यास मदत होत असते. शिवाय पोटाचा कोठा साफ ठेवणे, पचनक्रिया सुधारणे आदींसाठी पाणी महत्त्वाची भूमिका निभावत असते. त्यामुळे भरपूर पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत असतो.

अमली पदार्थांचे सेवन :

मद्यपान व धूम्रपान या दोन सवयी आजकाल स्टाइल आयकॉन म्हणून ओळखल्या जात असतात. परंतु याचे दूरगामी परिणाम आपल्या शरीराला भोगावे लागू शकतात. तंबाखूजन्य पदार्थ तसेच मद्यपानामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन संधिसाधू आजार जडू शकतात. फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस, कॅन्सर, हार्ट स्ट्रोक इत्यादी अनेक जीवघेणे आजार होऊ शकतात. या सवयींना वेळीच बंद केले नाही तर याची मोठी किंमत शरीराला चुकवावी लागते.

संबंधित बातम्या : 

त्वचेला कोणतेही नुकसान न पोचवता वँक्सिंग कसं करायचं? जाणून घ्या

योगा केल्यानंतर कसा असावा डाएट? जाणून घ्या सविस्तर माहिती…