वेफर्स, चॉकलेट, बिस्किटांमधून शरीरात जातंय विष, पॅकेज्ड फूडबद्दल धक्कादायक माहिती समोर

भारतात विकल्या जाणाऱ्या ८० टक्के पेक्षा जास्त पॅकेज्ड फूडमध्ये साखर, मीठ आणि पाम तेलाचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे 'ट्रुथइन' अहवालात समोर आले आहे.

वेफर्स, चॉकलेट, बिस्किटांमधून शरीरात जातंय विष, पॅकेज्ड फूडबद्दल धक्कादायक माहिती समोर
packet food
| Updated on: May 19, 2026 | 1:03 PM

आपल्यापैकी कितीतरी जण दररोज वेफर्स, बिस्कीट, कोल्ड ड्रिंक्सचे सेवन करत असतो. तुम्ही आणि तुमची मुलंही रोज आवडीने बिस्किटे, शीतपेये (कोल्ड ड्रिंक्स) किंवा झटपट तयार होणारे खाद्यपदार्थ (रेडी-टू-ईट फूड) खात असतील तर आजपासूनच त्यावर बंदी घाला. कारण या पॅकेज्ड फूडबद्दल एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. नेटफर्स्ट आणि त्यांच्या ‘ट्रुथइन’ (TruthIn) यांनी केलेल्या एका मोठ्या विश्लेषणातून भारतातील पॅकेज्ड फूड उद्योगाचा पर्दाफाश झाला आहे. यानुसार देशातील ८० टक्के पेक्षा जास्त पॅकेज्ड फूडमध्ये कृत्रिम स्वाद, रंग आणि साखरेचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा खूप जास्त असल्याचे उघड झाले आहे.

या अहवालात आधुनिक एआय (AI) साधनांचा वापर करून २५ पेक्षा जास्त श्रेणींमधील सुमारे २३,००० खाद्य उत्पादनांच्या लेबल्सचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे, ज्याचे निष्कर्ष अत्यंत चिंताजनक आहेत. या संशोधनातून समोर आलेली आकडेवारी डोळे उघडणारी आहे

यानुसार साधारण ८० टक्क्यांपेक्षा जास्त बिस्किटांमध्ये कृत्रिम स्वाद (आर्टिफिशियल फ्लेवर्स) आणि स्वस्त पाम तेलाचा (Palm Oil) सर्रास वापर केला जात आहे. तब्बल ९८ टक्के कोल्ड ड्रिंक्समध्ये आरोग्याला हानिकारक असणारे कृत्रिम घटक आढळले आहेत. जवळपास ९६% झटपट तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये कृत्रिम घटकांचा वापर करण्यात येतो. यातील ९० टक्के पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे. गोड चॉकलेट्स आणि डेसर्टमध्ये ८०% पेक्षा जास्त अतिरिक्त साखर (एडेड शुगर) आणि फॅट आढळले आहे, जे आरोग्याच्या सर्व मानकांचे उल्लंघन करते. सकाळी खाल्ल्या जाणाऱ्या नाश्ताच्या पदार्थांमध्ये ६० ते ७० टक्क्यांपर्यंत कृत्रिम घटकांची भेसळ असल्याचे समोर आले आहे.

तज्ज्ञांचा इशारा आणि ग्राहकांचा निष्काळजीपणा

‘ट्रुथइन’चे डॉक्टर अमन शेख बशीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व प्रकारच्या पॅक केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये जास्त फॅट, साखर, मीठ आणि कृत्रिम स्वादांचे एकसारखेच धोकादायक पॅटर्न पाहायला मिळत आहे. कंपन्या पदार्थांची चव वाढवण्यासाठी आणि ते दीर्घकाळ टिकवण्यासाठी रसायनांचा हा खेळ खेळत आहेत. या अहवालात ‘राष्ट्रीय पोषण संस्थान’ (NIN) च्या एका अभ्यासाचा हवाला देण्यात आला आहे.

या अभ्यासानुसार, देशातील ७५.४ टक्के ग्राहक फूड पॅकेटवर असलेला लेबल वाचत असल्याचा दावा करतात. मात्र त्यातील केवळ १४.७ टक्के लोकच पाकिटाच्या मागे दिलेली घटकांची यादी (Ingredients List) लक्षपूर्वक पाहतात. ग्राहकांच्या याच निष्काळजीपणाचा फायदा कंपन्या घेत आहेत. सध्या पॅकेज्ड फूडची वाढती क्रेझ आपल्या पुढच्या पिढीला लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयविकारासारख्या गंभीर आजारांचे शिकार बनवत आहे, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे खरेदी करताना केवळ चव न पाहता पदार्थांमधील घटकांची तपासणी करणे आता अनिवार्य झाले आहे.

Follow Us