अखेर ‘खालिद के शिवाजी’ ओटीटीवर; चित्रपटावरून झालेला मोठा वाद, हिंदू महासंघाने केलेली बंदीची मागणी
विदर्भातील अकोला, अमरावती आणि नागपूर या परिसरात चित्रित झालेल्या या चित्रपटात अस्सल वऱ्हाडी भाषेचा गोडवा अनुभवायला मिळतो. स्थानिक कलाकारांचा मोठा सहभागही या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. विदर्भातील अनेक नवोदित कलाकारांना जागतिक प्रेक्षकांसमोर येण्याची संधी मिळाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत. त्यांच्या विचारांनी आणि जीवनमूल्यांनी आजही लाखो लोकांना योग्य दिशा दिली आहे. याच विचारांना एका वेगळ्या आणि संवेदनशील कथेतून मांडणारा ‘खालिद के शिवाजी’ हा मराठी चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांची आणि समीक्षकांची प्रशंसा मिळवल्यानंतर आता Apple TV OTT, Book My Show OTT आणि YouTube Movies या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. ‘खालिद के शिवाजी’ या चित्रपटात प्रियदर्शन जाधव, भारत गणेशपुरे, सुषमा देशपांडे, कैलास वाघमारे, स्नेहलता तागडे यांच्या प्रभावी भूमिका असून, खालिदची मध्यवर्ती भूमिका क्रिश मोरे याने अत्यंत सहजतेने साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राज प्रितम मोरे यांनी केलं असून लेखन कैलास वाघमारे यांचं आहे.
दिग्दर्शक राज प्रितम मोरे म्हणाले, ‘खालिद के शिवाजी‘ हा माझा पहिला मराठी चित्रपट असून, या चित्रपटासाठी मी दोन ते तीन वर्षे मेहनत घेतली. आज हा चित्रपट Apple TV, BookMyShow आणि YouTube Movies वर जगभर प्रदर्शित होत असल्याचा मला मनापासून आनंद आहे. माझ्यावर विश्वास ठेवणारे निर्माते मायकल थेवर आणि संपूर्ण टीमचे मी ऋणी आहे. अकोल्यातील नागरिकांनी चित्रीकरणादरम्यान दिलेले प्रेम आणि सहकार्यही माझ्यासाठी कायम स्मरणात राहील.”
ही एका निरागस मुलाची खालिदची कथा आहे. समाजव्यवस्थेतील दोषपूर्ण रचनेचा तो नकळत बळी ठरतो. या व्यवस्थेतून स्वतःला मुक्त करण्याचा तो प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्या समोर जात, धर्म, लिंग, पंथ, वंश आणि अशा अनेक सामाजिक भेदभावांचं कटू वास्तव उलगडत जातं. एका लहान मुलाच्या नजरेतून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा हा प्रयत्न आहे. आपल्या समाजात आजही खोलवर रुजलेल्या अन्यायकारक आणि विषारी व्यवस्थेचं शुद्धीकरण व्हावं, समानता, मानवता आणि परस्पर सन्मानाची भावना अधिक दृढ व्हावी, हा या कथेचा प्रामाणिक उद्देश असल्याचं दिग्दर्शक राज प्रितम मोरे सांगतात.
चित्रपटात खालिद नावाच्या एका निरागस मुस्लिम मुलाची कथा उलगडते. शाळेत त्याला ‘अफजल खान’ म्हणून चिडवलं जात असल्यामुळे त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांची उत्तरं शोधताना तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांपर्यंत पोहोचतो आणि त्यांच्या जीवनमूल्यांचा खरा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो. समाजात वाढत चाललेल्या धार्मिक आणि सामाजिक दुराव्याच्या पार्श्वभूमीवर एक मुस्लिम मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा शोध घेतो, ही या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारी ठरली.
