
मान्सून म्हणजे हिरवळ, गार वारे आणि पावसाच्या सरींनी नटलेली निसर्गरम्य दृश्यं. अशा हवेचा आनंद घेताना कॅम्पिंगसारखा अनुभव हवाहवासा वाटतो. विशेषतः डोंगरांमध्ये, धबधब्यांजवळ किंवा जंगलात तंबू टाकून एक रात्र घालवणं म्हणजे साहस आणि शांततेचा परिपूर्ण संगम. पण जसं हे रोमांचक आहे, तसं काहीशा अडचणीचंही. कारण पावसाळ्यात निसर्गचक्र जरा अधिक अस्थिर असतं आणि जर योग्य तयारी नसेल तर मजा झटक्यात त्रासात बदलू शकते. म्हणूनच, जर तुम्ही पावसात कॅम्पिंगसाठी बाहेर पडण्याचा विचार करत असाल, तर खालील टिप्स जरूर लक्षात ठेवा.
साध्या टेंटचा पावसात काही उपयोग नाही. तुमचं निवासस्थान पूर्णपणे पाण्यापासून सुरक्षित राहणं गरजेचं आहे. त्यामुळे ट्रिपसाठी बाहेर पडताना एक चांगल्या क्वालिटीचा, मजबूत झिप असलेला वॉटरप्रूफ टेंट निवडा. त्यात रेन कव्हरही असावं.
कॅम्पिंगसाठी ढलाण किंवा खोल जागा टाळा. अशा ठिकाणी पावसाचं पाणी साचून राहण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी जमिनीपासून थोडी उंच आणि कोरडी, सपाट जागा निवडा. यामुळे टेंटमध्ये पाणी शिरण्याचा धोका कमी होतो.
पावसाळ्यात तुमचं इलेक्ट्रॉनिक उपकरण, कपडे किंवा इतर महत्त्वाचा सामान ओलसर होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे ड्राय बॅग आणि वॉटरप्रूफ बॅकपॅकमध्येच सामान पॅक करा. सोबत हलकासा रेनकोट आणि पाण्याचा प्रतिकार करणारी जॅकेटही जरूर ठेवा.
कॉटन कपडे पावसात भिजून जड होतात आणि सुकायलाही वेळ लागतो. त्यामुळे कॅम्पिंगसाठी नायलॉन किंवा पॉलिस्टरसारखे फास्ट-ड्राय कपडेच वापरा, जे पटकन सुकतात आणि शरीर थंड होऊ देत नाहीत.
पावसात कॅम्पफायर लावणं कठीण असतं. त्यामुळे वाटरप्रूफ लायटर आणि कोरडं लाकूड सोबत घेऊन जा. अन्नपदार्थ एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवा, जेणेकरून ते ओलसर हवामानामुळे खराब होणार नाहीत.
मुंबईत कॅम्पिंगसाठी निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायचा असेल, तर ही तीन ठिकाणं नक्कीच ट्राय करायला हवीत. कर्जत हे ठिकाण पर्वतरांगा, धबधबे आणि झऱ्यांसाठी प्रसिद्ध असून ट्रेकिंग आणि कॅम्पिंगसाठी उत्तम आहे. पालघरजवळचं खोपोली हे थंड हवामान आणि शांत वातावरणासाठी ओळखलं जातं आणि कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी योग्य ठिकाण आहे. तर वासिंदजवळचं आसावली हे गाव झाडीने वेढलेलं असून तिथे तुम्हाला सरळसोपं रिव्हर कॅम्पिंग करता येतं, जे नवख्या कॅम्पर्ससाठीही योग्य आहे. या ठिकाणी तुम्ही शांतता, निसर्ग आणि साहसाचा एकत्र अनुभव घेऊ शकता.