चव भारी पण आरोग्यावर भारी? मसालेदार पदार्थांमुळे शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या

मसालेदार पदार्थांमुळे जेवणाची चव नक्कीच वाढते, पण तिखट पदार्थांचे अतिसेवन आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते. यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हीही जास्त प्रमाणात तिखट पदार्थ खात असाल तर त्यामुळे आरोग्याला कोणत्या समस्या निर्माण होतात ते जाणून घेऊयात.

चव भारी पण आरोग्यावर भारी? मसालेदार पदार्थांमुळे शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या
Spicy food
| Edited By: | Updated on: Aug 21, 2026 | 9:53 AM

आपल्यापैकी अनेकजण मसालेदार आणि तिखट पदार्थ खाण्याचे खूप शौकीन आहेत. त्यात मसालेदार पदार्थ भारतीय जेवणाचा महत्त्वाचा भाग आहे. कारण मिरची आणि मसाल्यांमुळे पदार्थांला चव, सुगंध आणि खास तिखटपणा मिळतो. मिरचीतील कॅप्सायसिन या घटकामुळे तिखटपणा जाणवतो. मिरची खाल्ल्यानंतर कॅप्सायसिन शरीरातील विशिष्ट रिसेप्टर्सना सक्रिय करते आणि त्यामुळे उष्णता किंवा जळजळ जाणवते. मात्र, तिखट पदार्थांचा परिणाम प्रत्येकाच्या शरीरावर वेगवेगळा होऊ शकतो. काहींना झणझणीत मसालेदार पदार्थ पचायला हलके वाटते, तर काहींना अस्वस्थता जाणवते.

तर मसालेदार पदार्थांचे सेवन केल्याने शरीरावर होणारा परिणाम हा प्रत्येक व्यक्तीच्या पचनशक्ती आणि खाण्याच्या प्रमाणावर अवलंबून असतो. जास्त तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्यास काही जणांना ॲसिडिटी, छातीत जळजळ, पोटदुखी किंवा अपचनाचा त्रास होतो. त्यामुळे मसालेदार पदार्थ खाताना प्रमाणाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. चला तर मग तिखट पदार्थांमुळे होणाऱ्या संभाव्य समस्या आणि त्या टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, ते आजच्या लेखात जाणून घेऊयात.

मसालेदार पदार्थ खाल्ल्याने या समस्या उद्भवू शकतात

क्लीव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार, अति तिखट पदार्थ खाल्ल्याने शरीरात काही त्रास जाणवू शकतात. सुरुवातीला तोंड आणि घशात जळजळ होऊ शकते. त्यानंतर काही लोकांना छातीत जळजळ, पोटदुखी किंवा पोटात अस्वस्थता जाणवू शकते. तिखट पदार्थांमुळे काही जणांमध्ये ॲसिड रिफ्लक्सचा त्रास वाढू शकतो. तसेच, खूप तिखट मिरची खाल्ल्यास आतड्यांवर परिणाम होऊन जुलाब किंवा पोटदुखीची समस्या उद्भवू शकते.

जर एखाद्या व्यक्तीचे पोट आधीपासूनच संवेदनशील आहे, त्यांना मसालेदार पदार्थांमुळे त्रास होण्याची शक्यता अधिक असू शकते. मात्र, तिखट पदार्थांचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळा दिसून येतो. तिखट खाल्ल्यानंतर वारंवार छातीत जळजळ, जुलाब, पोटदुखी किंवा अस्वस्थता जाणवत असेल, तर मिरची आणि मसालेदार पदार्थांचे प्रमाण कमी करणे. त्रास वारंवार होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणेही महत्त्वाचे आहे.

तुम्हाला मसालेदार पदार्थ आवडत असतील, तर या गोष्टी लक्षात ठेवा

तुम्हाला जर तिखट पदार्थ खायला खुप आवडत असतील तर ते पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही, पण आपल्या शरीराला किती तिखट सहन होतं, याचा अंदाज घेऊनच त्याचे प्रमाण ठरवा. एकाच वेळी खूप तिखट पदार्थ खाणं टाळा, विशेषतः त्यानंतर पोटात किंवा छातीत जळजळ होत असेल तर.

हॉट सॉस आणि पॅकेज्ड मसाल्यांचा वापरही मर्यादित ठेवा. कारण यामध्ये मिरचीसोबत मीठ आणि इतर घटकांचे प्रमाण जास्त असू शकते. तिखट खाल्ल्यानंतर वारंवार पोटदुखी, आम्लपित्त, छातीत जळजळ किंवा जुलाब होत असतील, तर मसालेदार पदार्थांचे सेवन कमी करा.

त्रास वारंवार होत असेल किंवा वाढत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. रोजच्या आहारात संतुलन ठेवणे आणि आपल्या शरीराला न झेपणारे अति तिखट पदार्थ टाळणे हा सर्वात चांगला उपाय आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us