Marathi News Lifestyle Travel Ayodhya Ram Mandir ten interesting facts that you need to know from time capsule buried to Soil from Thailand
मंदिराखाली पुरलेलं टाइम कॅप्सूल ते थायलंडहून आलेली माती.. अयोध्येतील राम मंदिराविषयी 10 खास गोष्टी
अयोध्येतील राम मंदिराविषयी जाणून घेण्यासाठी प्रचंड उत्सुकता आहे. येत्या 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वी मंदिराखाली पुरण्यात आलेल्या टाइम कॅप्सूलपासून थायलंडहून आणलेल्या मातीपर्यंत या मंदिराबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात..
अयोध्या : 17 जानेवारी 2024 | येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. देशभरातील असंख्य लोकांना या ऐतिहासिक दिवसाची प्रतीक्षा आहे. अयोध्येत या सोहळ्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी 8000 पेक्षाही अधिक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. या मंदिरात पूजा कशी होणार, त्याचं वैशिष्ट्य काय, याबद्दल जाणून घेण्यास अनेकजण उत्सुक आहेत. अयोध्येतील या राम मंदिराविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात..
मंदिराच्या रचनेनुसार अयोध्येतील राम मंदिर हे भारतातील सर्वांत मोठं मंदिर बनणार आहे. मंदिराची रचना करणाऱ्या सोमपुरा कुटुंबाने याबद्दलची माहिती दिली आहे. या मंदिराच्या स्थापत्य योजनेची कल्पना चंद्रकांत सोमपुरा यांचा मुलगा आशिष सोमपुरा यांनी 30 वर्षांपूर्वी केली होती. हे मंदिर जवळपास 161 फूट उंचीवर आणि 28 हजार चौरस फूट परिसरावर बांधण्यात येत आहे.
राम मंदिराचा पाया बांधण्यासाठी 2587 प्रदेशांतील पवित्र माती आणण्यात आली होती. यामधअये झाशी, बिथुरी, हल्दीघाटी, यमुनोत्री, चित्तोडगड, सुवर्ण मंदिर यांसारख्या अनेक पवित्र स्थळांचा समावेश आहे.
राम मंदिराची रचना करणारे हे प्रतिष्ठित सोमपुरा कुटुंबातील आहेत. ते जगभरातील 100 हून अधिक मंदिरं बांधण्यासाठी ओळखले जातात. त्यात सोमनाथ मंदिराचाही समावेश आहे. मुख्य वास्तुविशारद चंद्रकांत सोमपुरा यांच्या नेतृत्वाखाली त्यांची मुलं आशिष आणि निखिल हे मंदिर वास्तुकलेचा वारसा पुढे नेत आहेत.
काही रिपोर्ट्सनुसार, या मंदिराच्या बांधकामासाठी लोखंड किंवा पोलादचा वापर करण्यात आलेला नाही. राम मंदिर हे पूर्णपणे दगडांनी बांधण्यात आलं आहे. त्यात कोणत्याही प्रकारचा स्टील किंवा लोखंड वापरण्यात आलेला नाही.
राम मंदिर बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विटांवर ‘श्रीराम’ असं कोरलं गेलंय. राम सेतू बांधताना प्रत्येक नावावर ‘श्रीराम’ असंच लिहिण्यात आलं होतं.
22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी थायलंडहून माती पाठविण्यात आली आहे. थायलंडशी श्रीराम यांचं खास नातं आहे. मातीच्या आधी थायलंडने दोन नद्यांचं पाणीसुद्धा पाठवलं होतं. श्रीराम यांच्या वंशजांनी थायलंडमध्ये शासन केल्याचंही म्हटलं जातं.
या तीन मजली मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे ते 2.7 एकर जमिनीवर पसरलेलं आहे. तळमजल्यावर प्रभू श्रीराम यांच्या जीवनाचं चित्रण केलं गेलंय. तर पहिला मजला हा राजस्थानच्या भरतपूरमधील गुलाबी वाळूच्या दगडाने बांधण्यात आला आहे. याठिकाणी श्रीराम यांच्या भव्य दरबाराचं चित्रण होईल. या मंदिराची लांबी 360 खूट, रुंदी 235 फूट आणि उंची 161 फूट इतकी आहे. या मंदिराला एकूण 12 दरवाजे असतील.
संपूर्ण भारतातील 150 नद्यांच्या पवित्र पाण्याने 5 ऑगस्ट रोजी मंदिरात अभिषेक सोहळा पार पडला होता.
मंदिराच्या 2000 फूट खाली पुरलेल्या टाइम कॅप्सूलमध्ये मंदिर, प्रभू श्रीराम आणि अयोध्या यांच्याविषयी संबंधित माहिती कोरलेली एक तांब्याची पाटी आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी ही माहिती जपण्यात आली आहे.
नागर शैलीत बांधण्यात आलेल्या या मंदिरात 360 खांब आहेत. हे मंदिर म्हणजे स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना मानलं जात आहे.