सांगली लोकसभा : गोपीचंद पडळकर काँग्रेसचे उमेदवार?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

सांगली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. टीव्ही 9 मराठी या पार्श्वभूमीवर राज्यभरातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात 2014 पर्यंत काँग्रेस अपराजित होती. इथल्या  मतदारांनी कित्येक वर्ष काँग्रेसला भरभरुन मतदान दिलं. तब्बल चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या घराण्याचे या सांगली लोकसभा […]

सांगली लोकसभा : गोपीचंद पडळकर काँग्रेसचे उमेदवार?
Follow us on

सांगली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. टीव्ही 9 मराठी या पार्श्वभूमीवर राज्यभरातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात 2014 पर्यंत काँग्रेस अपराजित होती. इथल्या  मतदारांनी कित्येक वर्ष काँग्रेसला भरभरुन मतदान दिलं. तब्बल चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या घराण्याचे या सांगली लोकसभा मतदारसंघावर वर्चस्व कायम राहिले. जिल्ह्याच्या विविध सत्ता केंद्रात अनेक वेळा चढ-उतार आले, मात्र लोकसभेच्या निवडणुकीत पाटील घराण्यातील उमेदवाराचा 2014 पर्यंत पराभव झाला नाही. त्यामुळेच वर्षानुवर्षे खासदारकी पाटील घराण्याकडे टिकून  राहिली. स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे नातू आणि केंद्रीय कोळसामंत्री प्रतिक पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. मात्र 2014 साली त्यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलेले संजय काका पाटील यांनी भाजपची उमेदवारी मिळवली आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत संजय काका पाटील यांनी तब्बल सव्वा दोन लाख मतांनी कांग्रेसच्या प्रतिक पाटील यांचा पराभव केला.

2014 साली मोदी लाट होती. यावेळी चित्र वेगळं असेल. संजय पाटील यांना एकूण 611563 मतं पडली. तर सव्वा दोन लाख मतांनी ते विजयी झाले.  खासदार संजय पाटील यांचा प्रमुख विरोधक हा सध्या धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हे आहेत. खासदार संजय पाटील यांचे विरोधक काँग्रेसचे प्रतिक पाटील हेही असतील. पडळकर कोणत्या पक्षाकडून लढणार हे निश्चित नसलं तरी काँग्रेसची उमेदवारी त्यांना मिळू शकते अशी चर्चा आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनेही पडळकर यांना वंचित बहुजन आघाडीमधून निवडणूक लढण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे पडळकर यांच्या भूमिकेवर लोकसभा निवडणुकीचं राजकारण अवलंबून आहे. काँग्रेसमध्ये सध्या माजी खासदार प्रतिक पाटील यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची स्थिती असली तरी, माजी मंत्री स्वर्गीय मदन पाटील यांची पत्नी श्रीमती जयश्री ताई पाटील ह्या सुद्धा लोकसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारीच्या प्रबळ दावेदार मानल्या जातात.

सांगली लोकसभा मतदारसंघाची रचना

सांगली लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदार संघ येतात. त्यामध्ये सांगली, मिरज, तासगाव- कवठेमहंकाळ, जत, पलुस, वीटा यांचा समावेश होतो. या सहापैकी भाजपकडे तीन, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येक एक असं चित्र आहे.

1)  राष्ट्रवादी ( तासगावमधून ) आमदार सुमन आर आर पाटील

2) काँग्रेसकडून  (पलुसमधून) आमदार डॉ. विश्वजीत कदम

3) शिवसेनेकडून ( विटामधून ) आमदार अनिल बाबर

4) भाजपकडून ( सांगलीमधून ) आमदार सुधीर गाडगीळ

5) भाजपकडून (जतमधून ) आमदार विलासराव जगताप

6) भाजपकडून (मिरजमधून ) आमदार सुरेश खाडे

सांगली जिल्ह्यात असणारे इस्लामपूर आणि शिराळा हे दोन विधानसभा मतदार संघ हे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आहेत. इस्लामपुर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे आमदार आहेत. तर शिराळा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे शिवाजीराव नाईक हे आमदार आहेत.

यावेळच्या प्रचारात कोणते मुद्दे असतील?

सांगली लोकसभा मतदारसंघात प्रमुख मुद्दा हा अपूर्ण सिंचन योजना असेल. कारण, यामुळे दुष्काळी भागाला मोठा फटका बसत आहे. बेरोजगारीचा प्रश्न कायम आहे. कोणताही मोठा उद्योग जिल्ह्यात आला नाही. मराठा आणि धनगर, लिंगायत (स्वतंत्र धर्माची मागणी), मुस्लीम समाजाच्या आरक्षणाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. धनगर समाजाला अजूनपर्यंत आरक्षण दिलं नसल्याने हा समाज भाजपविरोधी झाला आहे.

विद्यमान खासदारांची कामगिरी

खासदार संजय काका पाटील यांच्या प्रयत्नांतून सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ जलसिंचन योजनेसाठी केंद्र सरकारच्या पंतप्रधान सिंचन योजनेतून 2092 कोटींचा निधी मिळाला. तर टेंभू जलसिंचन योजनेसाठी 1298 कोटींचा निधी मिळाला. त्यामुळे ह्या योजनेची कामे अंतिम टप्प्यात आहे.

मुळात सांगली जिल्ह्यातील सहा तालुक्यात दुष्काळी परिस्थती कायम असते. अपूर्ण जलसिंचन योजना यामुळे इथले लोक अनेक वर्ष पाणी टंचाईचा सामना  करत आहेत. 1995 सालच्या युतीच्या काळात म्हैसाळ, ताकारी आणि टेंभू या योजना सुरु करण्यात आल्या. मात्र मागील 15 वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीला हे प्रकल्प पूर्ण करता आले नव्हते. ते आताच्या भाजपाच्या सत्तेत मार्गी लागले.

मिरज ते पुणे आणि मिरज ते लोंढा या मार्गाच्या दुहेरी रेल्वे मार्ग आणि विद्युतीकरनाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. पुढील एक वर्षात ही कामे पूर्ण होणार आहेत. रेल्वेच्या दुहेरीकरनाची अनेक वर्षाची मागणी होती. एनडीए सरकारने याला मंजुरी दिली.

सांगली जिल्ह्यातून जाणारे तीन रस्ते महामार्ग मंजूर करून घेतले आहेत. मनमाड ते चिकोडी-बेळगाव, रत्नागिरी ते नागपूर, विजापूर ते गुहागर हे महामार्ग सांगली जिल्हातून जाणार आहेत.  रांजणी येते ड्रायपोर्टसाठी मंजुरी मिळाली आहे. सांगलीसहीत आसपासच्या जिल्ह्यातील शेतीमालाला मोठं मार्केट तर मिळणार आहेच, शिवाय या ड्रायपोर्टमुळे नोकरी – रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे.

सांगली येथे केंद्र सरकारच्या माध्यमातून पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यात आले आहे. पूर्वी पासपोर्टसाठी पुण्याला जावे लागत होते. मात्र आता सांगलीतच पासपोर्ट कार्यालय झाल्यामुळे लोकांची सोय झाली आहे.

विकासाची ही कामे खासदार करत असले तरी जिल्ह्यातील अनेक प्रश्न अजून सुटले नाहीत. प्रकल्प उद्योग नाही, जलसिंचन योजना पूर्ण झाल्या नाहीत. रस्त्यांची अवस्था सुद्धा चांगली नाही. महामार्गासाठी जबरदस्तीने जमीन संपादन सुरु आहे. शेतीमालाच्या दराचा प्रश्न आहे. पेट्रोल, डीझेल आणि गॅसचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सर्वच बाबतीत महागाई वाढली आहे. जिल्ह्यात मोठे उद्योग आणण्यात खासदारांना अपयश आले आहे. रोजगाराची साधने जिल्ह्यात उपलब्ध करता आली नाहीत.

महत्त्वाचे म्हणजे सांगली जिल्ह्यातील ज्या नेत्यांच्या मदतीमुळे संजय पाटील निवडून आले होते, ते नेते संजय पाटील यांच्या विरोधात गेल्याने यावेळी मार्ग खडतर असेल.

संजय पाटलांचे संभावित विरोधक कोण?

खासदार संजय पाटील यांच्या विरोधात गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी मिळाली तर पडळकर हे धनगर समाजाचे मोठे नेतृत्त्व आहे. धनगर समाज पडळकरांना मानतो. बहुजन समाज आणि इतर समाजही गोपीचंद पडळकर यांच्या मागे उभा राहत आहे. त्यामुळे भाजपच्या संजय पाटील यांच्याविरोधात गोपीचंद पडळकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले तर निवडणुकीचा निकालही बदलू शकतो. काँग्रेसला ताकदीचा उमेदवार मिळत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. त्यात गोपीचंद पडळकरांनी काँग्रेसमधून निवडणूक लढवली तर भाजपला ताकतवर विरोधक मिळणार आहे.

राजकीयदृष्ट्या महत्वाचा मानल्या जाणाऱ्या सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपा विरुद्ध काँग्रेस अशीच लढत होणार आहे. काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात 2014 साली प्रथमच भाजपा विजयी झाली होती. एकीकडे भाजपाची जिल्ह्यातील वाढलेली ताकद, तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी आणि विविध प्रश्नांबाबत सत्ताधाऱ्यांच्या विषयी नागरिकांच्यातील नाराजी हे प्रमुख मुद्दे निवडणुकीवर परिणाम करणारे असणार आहेत.

नाट्यपंढरी आणि सहकारपंढरी म्हणून सांगली जितकी प्रसिद्ध आहे, तितकेच सांगलीचे महत्त्व राजकीय पटलावर सुद्धा आहे. स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी  तब्बल चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. सांगलीचे सुपुत्र असणारे अनेक दिग्गज नेत्यांनी देशाच्या आणि राजकारणात महत्वाच्या पदावर कार्य केले आहे आणि सध्याही करत आहेत.

परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या या सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस नेहमी विजयी होत आली आहे. मात्र मागील काही वर्षातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सत्ता संघर्षाचा फायदा मात्र अनपेक्षितपणे भाजपला झाला. सतत एकच पक्ष, मोदी लाट आणि भाजपला मिळालेला संजय काका पाटील यांच्या रूपाने तगडा उमेदवार यामुळे 2014 च्या निवडणुकीत भाजपा या ठिकाणी प्रथमच विजयी झाली.