माणसाच्या जीवापेक्षा चपलेला जास्त किंमत, नागपुरात मंदिराच्या बाहेर नको ते घडलं
गुन्ह्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. नशेत तरुण देखील नको ते कृत्य करु लागले आहेत. ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. आता देखील चपलेच्या वादातून तरुणाची हत्या करण्यात आली. जाणून घ्या नेमकं काय झालं...

संतापाच्या भरात तरुण कोणतं पाऊल उचलीत याबद्दल काहीही सांगता येत आहे. गेल्या काही दिवसांपासून वादातून झालेल्या हत्येच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आता देखील असंच काही झालं आहे. चप्पल अदलाबदलीच्या वादातून युवकाची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांना चार आरोपींना अटक केली असून, अधिक तपास सुरु आहे. रामटेक तालुक्यातील सोनेघाट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चौघान परिसरातील सोना ब्रिक्स वीट भट्टी येथे एक धक्कादायक घटना घटना घडली आहे. वादातून 18वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना रविवार रात्री घडली.
या प्रकरणात रामटेक पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. मृत तरुणाचे नाव समीर राजू ध्रुव असं असून तो फक्त 18 वर्षांचा होता. संबंधित प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, रामनवमी निमित्त 26 मार्च रोजी काही तरुण रामटेक गडमंदिर येथे दर्शनासाठी गेले होते. यावेळी मंदिराबाहेर ठेवलेल्या चपलांपैकी एका तरुणाने दुसऱ्याची चप्पल घातल्याने गैरसमज निर्माण झाला.
दुसऱ्या दिवशी हा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधित तरुणांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद पुढे वाढत गेला आणि रविवारी रात्री विकोपाला गेला. दारूच्या नशेत असलेल्या चार तरुणांनी संतापाच्या भरात समीर ध्रुव याच्यावर विटा आणि काठ्यांनी हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाल्याने घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्याला तात्काळ रामटेक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केलं.
घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. पोलीस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी तत्पर कारवाई करत अवघ्या काही तासांत चारही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून किरकोळ वादातून झालेल्या या हत्येने खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहे. त्यामुळे याप्रकरणी पुढे कोणती माहिती समोर येईल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.