
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मंगळवारी राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर बुधवारी मतमोजणी होणार आहे. दरम्यान आज या निवडणुकीसाठी प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, आणि प्रचार संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच आता मोठी बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगातील सूत्रांकडून मिळालेला माहितीनुसार निवडणूक प्रचार काळात अनेक नेत्यांकडून मतदारांना आर्थिक प्रलोभणं दाखवणारी वक्तव्य करण्यात आली आहेत, अशा वक्तव्याची आता निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून, त्यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवण्यात आला आहे. त्यामुळे आता या नेत्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
अशा नेत्यांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री शिरसाठ, मंत्री जयकुमार गोरे, भाजप नेत्या चित्र वाघ यांचा समावेश आहे, आता या नेत्यांना मतदारांना आर्थिक प्रलोभनं देणारी वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत प्रलोभने देणाऱ्या २० नेत्यांच्या वक्तव्यांची निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने ज्या ठिकाणी संबंधित नेत्यांनी वक्तव्य केली आहेत, त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून तत्काळ अहवाल मागवला आहे.
अजित पवार यांच्याकडून निधीला कात्री लावण्याचं वक्तव्य करण्यात आलं होतं. तुमच्याकडे मत तर माझ्याकडे निधी अशा अशयाचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. तर गुलाबराव पाटील यांनी लक्ष्मी दर्शन होणार अशा अशयाचं वक्तव्य केलं होतं. तर एकनाथ शिंदे यांनी तिजोरीच्या चाव्या संदर्भात विधान केलं होतं. तर खा कुणाचंही मटण पण दाबा कमळाचं बटण असं विधान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केल होतं. त्यामुळे समोर आलेल्या माहितीनुसार अशा वीस नेत्यांच्या नावाची यादी आता निवडणूक आयोगाकडून तयार करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्याकडून अहवाल देखील मागवण्यात आला आहे, त्यामुळे या नेत्यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यात आहे. दुसरीकडे भाजप कार्यकर्त्याच्या घरी छाप्या प्रकरणी निलेश राणे यांच्या देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.