त्या प्रकरणात मोठी अपडेट, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे एकाच दिवशी कोर्टात आमने-सामने?
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा 17 वर्षांपूर्वीच्या मानहानी खटल्यात जबाब नोंदवला जाणार आहे, या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा 17 वर्षांपूर्वीच्या मानहानी खटल्यात जबाब नोंदवला जाणार आहे, 2009 मध्ये दिवंगत वसंत डावखरे यांनी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर या चार जणांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 5 ऑगस्ट रोजी होणार आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान दाखविण्यात आलेल्या एका कथित व्हिडीओ प्रकरणात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता, दरम्यान या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. याबाबत ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि उद्धव ठाकरे यांचे वकील जयेश वाणी यांनी माहिती दिली आहे.
नेमकं काय म्हणाले जयेश वाणी?
2009 च्या मानहानी प्रकरणात उद्धव ठाकरे यांचा जबाब व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (VC) नोंदवावा, यासाठी जयेश वाणी यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, 5 ऑगस्ट रोजी कोणतेही समन्स बजावण्यात आलेले नसून, न्यायालयाने आरोपींना कोणतीही नवीन नोटीस दिलेली नाही. या प्रकरणात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 313 अंतर्गत आरोपींचे जबाब नोंदवले जाणार आहेत. संपूर्ण खटल्यात आनंद परांजपे, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवळेकर असे चार आरोपी आहेत. न्यायालयाने अद्याप या चौघांनाही कोणताही विशेष आदेश किंवा समन्स जारी केलेला नाही. सरकारी पक्षाने पुरावा बंद करण्यासाठी अर्ज दाखल केला असून, सर्व महत्त्वाचे साक्षीदार तपासून झाले आहेत.
आणखी साक्षीदार तपासायचे नसल्याने सरकारी पक्षाने पुरावे बंद करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. पुरावे बंद झाल्यानंतर न्यायालयाने कलम 313 अंतर्गत आरोपींचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या खटल्यात सुमारे 10 ते 12 साक्षीदार आणि तपास अधिकाऱ्यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत. आरोप आणि साक्षीदार समान असले तरी खटले स्वतंत्र असल्यामुळे सर्व आरोपींनी एकाच दिवशी उपस्थित राहणे बंधनकारक नाही. त्यामुळे चारही आरोपी वेगवेगळ्या दिवशी न्यायालयासमोर आपले जबाब नोंदवणार आहेत, अशी माहिती या प्रकरणावर बोलताना जयेश वाणी यांनी दिली आहे.
अर्ज मंजूर झाल्यास उद्धव ठाकरे यांचा 5 ऑगस्टला आणि एकनाथ शिंदे यांचा 6 ऑगस्टला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे. मात्र जर अर्ज मंजूर झाला नाही तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे जबाब नोंदवण्यासाठी न्यायालयात आमने-सामने येणार का? हे पहाणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
