देशातील शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त, विद्यार्थी चिंतेने भयभीत; दीपके भडकले, मनातलं सगळं बोलून गेले
देशातील शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. त्यात विद्यार्थी चिंतेने भयभीत झालाय, असं म्हणत दीपके भडकले. ते मनातलं सगळं बोलून गेले.

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी दिल्लीतील एका विद्यार्थ्याच्या मृत्यूवरून सरकारवर संताप व्यक्त केला आहे. देशातील सर्व शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. आयआयटी दिल्लीत 31 वर्षीय विद्यार्थी ऋषिकेश कुमारच्या आत्महत्येवरून दीपकेंनी दु:ख व्यक्त केलं. विद्यार्थ्यांना भीती वाटू नये, अशा वातावरणाची गरज आहे. खरंतर देशातील विद्यार्थी भविष्याच्या चिंतेने घाबरला आहे. ही भीती दूर करण्याची गरज आहे, असं मत अभिजीत दीपके यांनी व्यक्त केलं.
आयआयटी सारख्या संस्थेची गणना ही देशातील सर्वात चांगल्या शैक्षणिक संस्थांमध्ये होते. मागील वर्षभरात आयआयटीमधील 65 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. ही अवस्था आपल्या सर्वात चांगल्या शिक्षण संस्थेची आहे. विद्यार्थ्यांना एकटे सोडले जाऊ नये. त्यांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजे. परंतु विद्यार्थ्यांना संघर्षाच्या लढाईत एकटं सोडलं जातं, असे अभिजीत दीपके पुढे म्हणाले.
नेमकं काय घडलं?
ऋषिकेशचा 22 ऑगस्ट रोजी लेक्चर हॉलच्या कॉम्पलेक्सच्या सहाव्या मजल्यावरून खाली कोसळून मृत्यू झाला. पोलिसांना त्याच्याजवळ कोणतीही चिठ्ठी आढळली नाही. पोलीस त्याच्या मृत्यूचे कारण शोधत आहेत. आयआयटी दिल्लीने विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी एका चौकशी समितीची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. यात दिल्ली हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती, एम्सचे प्राध्यापक प्रताप शरण यांचा समावेश आहे. यासहित आयआयटी दिल्लीचे कुलसचिव आणि विद्यार्थ्यांच्या चार प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे.
सुभाष चंद्रांवर साधला निशाणा
अभिजीत दीपके यांनी सुभाष चंद्रा यांच्यावर देखील निशाणा साधला. 22 हजार कोटींचं कर्ज हे ६ कोटी स्वीकारून माफ करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला का? असा सवाल दीपके यांनी उपस्थित केला. तुमच्यावर 50 लाखांचं गृहकर्ज असेल. तर बँक फक्त 50 हजार घेऊन माफ करेल का? असा सवाल दीपकेंनी उपस्थित केला. सर्वसामान्यांना व्याजासहित पैसे भरावे लागतात. या लोकांना मुद्दल देखील भरायची गरज लागत नाही, अशी टीका दीपकेंनी केली. ‘आम्हाला शिक्षणावरील कर्जावरही व्याज भरावे लागते. 22 हजार कोटींची कर्जफेड कुठून करण्यात आली? ही आपल्या खिशातून झाली आहे. आपल्या कराच्या पैशांमधून झाली आहे, अशी टीका दीपके यांनी केली.
