ST Strike: तुटेल एवढं ताणू नये; एकाच वाक्यात शरद पवारांचा सल्ला!

| Updated on: Nov 15, 2021 | 10:24 PM

राज्याची आर्थिक स्थिती गंभीर आहे. त्यात सध्या राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. त्यांनी योग्य असतील तरच मागण्या कराव्यात, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.

ST Strike: तुटेल एवढं ताणू नये; एकाच वाक्यात शरद पवारांचा सल्ला!
शरद पवार.
Follow us on

नाशिकः सध्या राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. मात्र, त्यांनी योग्य असतील तरच मागण्या कराव्यात. कारण राज्याची आर्थिक स्थिती गंभीर आहे. मागण्या मान्य करण्यासाठी तुटेल एवढं ताणू नका, असा सल्ला अवघ्या एका वाक्यात सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी संपकऱ्यांना दिला. ते नाशिकमध्ये बोलत होते.

संस्था चालकांनी तारतम्य ठेवावे

पवार म्हणाले, शिक्षण खात्याचा अति हस्तक्षेप नको, अशा काही शिक्षण संस्था चालकांच्या तक्रारी आहेत. सरकारी हस्तक्षेपाला मर्यादा हव्या, पण संस्था चालकांनीही तारतम्य ठेवणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. मागच्या सरकारनं त्यांच्या कार्यकाळात भरती होऊ दिली नाही. मागच्या सरकारनं संस्था चालकांकडे चमत्कारिक नजरेनं पाहिलं. मागच्या सरकारनं अनेक गोष्टी तशाच ठेवल्या. भरती थांबवली. त्यामुळे 4 हजार पदं रिक्त आहेत. रयत शिक्षण संस्था सध्या अनेक समस्यांना तोंड देतेय. तेव्हा इतर शिक्षण संस्थाना काय अडचणी असतील, याचा अंदाज येतो. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

अन् शिक्षण खात्यातून सुटका

शरद पवार म्हणाले की, शिक्षण संस्था चालकांना त्यांच्या मागण्या राज्यसरकारकडे मांडाव्या लागतील. सिनियर मंत्री छगन भुजबळ आपल्या बरोबर आहेत. त्यांच्या माध्यमातून तुमच्या मागण्या सरकारकडे मांडू. सरकार दखल घेईल. शिक्षकांचं शिष्टमंडळ आपल्या मागण्या घेऊन यायचं. त्यांच्या मागण्या मान्य केल्या की कोट्यवधी रुपयांचे बर्डन येत होतं. चव्हाण साहेबांनी मला विचारलं, मंत्रिमंडळात तुम्हाला कोणतं काम करायचं आहे? मी त्यांना सांगितलं शिक्षण खात्यातून माझी सुटका करा, कृषी खातं द्या. शिक्षण संस्थांचा अनुदानाचा प्रश्न सोडवण्यासाठी नगरविकास, अर्थ मंत्री महामंडळ प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक घेऊन प्रश्न सोडवावा लागेल.

शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण फुलेंनी केलं

शरद पवार म्हणाले, देशाच्या अनेक राज्यात शिक्षणाचा विस्तार झाला. शिक्षण विस्तार करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे. महाराष्ट्रात शिक्षण विस्ताराची जबाबदारी एका ठराविक वर्गानंतर खासगी शिक्षण संस्थानी उचलली. अनेकांनी शिक्षणसंस्था सुरू केल्या. शिक्षणसंस्था वाढवण्याचं काम अनेकांनी केलं. अनेक मान्यवरांनी शिक्षणसंस्था मोठ्या केल्या आणि ज्ञानदानाचं काम केलं. शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करण्याचं काम खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलं. वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचं काम ज्योतिबा फुलेंनी केलं. शिक्षणाचा जागर करण्याचं काम खऱ्या अर्थानं महात्मा फुलेंनी केलं.

इतर बातम्याः

Malegaon हिंसाचाराची भयंकर साखळीः 1 नगरसेवक, 1 आक्षेपार्ह क्लिप, 4 जणांकडून Viral

राज्यात सारं निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून, आम्ही जुळवून घेतलंय, तुम्ही दिवस मोजा; शरद पवारांचा थेट इशारा!