
राजस्थानमधील कोटा येथे दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक फॉर्च्युनर कार हायवेवरून सुमारे 30 फूट खाली कोसळली. या अपघातात कार 3 जणांचा मृत्यू झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार दोन कार घेऊन पुण्यातील 10 मित्रांचा एक ग्रुप लेह-लडाख आणि जम्मू-काश्मीरला फिरायला गेला होता. यानंतर घरी परतत असताना ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून ते पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.
पुण्याच्या मित्रांचा हा अपघात कोटा जिल्ह्यातील कैथून पोलीस ठाण्याच्या हद्दीत, बालापुरा आणि कराडिया यांच्या दरम्यान झाला. बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास झालेल्या या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. कैथून पोलीस ठाण्याचे प्रभारी मनोज सिकरवार यांनी सांगितले की, 10 मित्रांचा गट 26 फेब्रुवारीला सहलीसाठी निघाला होता. लेह-लडाख आणि जम्मू-कश्मीर येथे फिरून हे सर्वजण दोन कारद्वारे पुण्याकडे परतत होते. फॉर्च्युनर कार चालवणाऱ्या चालकाला डुलकी लागल्यामुळे गाडी आधी डिव्हायडरला धडकली त्यानंतर हा भीषण अपघात झाला.
समोर आलेल्या माहितीनुसार, फॉर्च्युनर कार डिव्हायडरला धडकल्यानंतर हायवेच्या कडेला 30 फूट खाली कोसळली. या कारमध्ये 3 मित्र होते तर मागील गाडीत 7 मित्र होते. या अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. अपघातानंतर इतर मित्र जखमी मित्रांच्या मदतीसाठी धावले. स्थानिक लोकांच्या मदतीने तिघांना कारमधून बाहेर काढले आणि कैथून सीएचसीमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतांमध्ये सिद्धांत (21), कुणाल (25) आणि मयूरेवा (23) यांचा समावेश असून हे तिघेची चांगले मित्र होते.
या अपघातातील मृतांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन पोस्टमार्टमगृहात पाठवले आहेत. मृतांचे नातेवाईक आल्यानंतर पोस्टमार्टम करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सीएचसी प्रभारी डॉ. राजेश सामर यांनी सांगितले की, ‘रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिघांचा मृत्यू झाला होता.’ दरम्यान, या अपघातानंतर इतर 7 मित्रांसह मृतांच्या कुटुंबीयांवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.