कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव मतदार संघातल्या अनुदान वाटप घोळप्रकरणी अखेर दोषींवर होणार कारवाई

कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी अनुदान वाटप घोळप्रकरणी अखेर दोषींवर कारवाई होणार असल्याचे समजते. त्याचा अहवाल तयार झाला असून, दिवाळीनंतर संबंधितावर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव मतदार संघातल्या अनुदान वाटप घोळप्रकरणी अखेर दोषींवर होणार कारवाई
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Nov 01, 2021 | 11:05 AM

नाशिकः कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी अनुदान वाटप घोळप्रकरणी अखेर दोषींवर कारवाई होणार असल्याचे समजते. त्याचा अहवाल तयार झाला असून, दिवाळीनंतर संबंधितावर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कृषिमंत्र्यांचा मतदार संघ असलेल्या मालेगावमध्ये गेल्यावर्षी जून ते ऑक्टोबर या काळात पावसाने थैमान घातले. त्यामुळे तब्बल 1 लाख 3 हजार 67.78 हेक्टरवरील पीक पाण्यात बुडाले. 1 लाख 14 हजार 801 शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. हे पाहता सरकारने त्यांना पहिल्या टप्प्यात 40 कोटी 82 लाख 8 हजार 44 रुपयांचे अनुदान मंजूर केले. त्याचा 35 हजार 181 शेतकऱ्यांनी लाभ घेतला. दुसऱ्या टप्प्यातही 45 कोटी 88 लाख 78 हजार रुपयांचे अनुदान मंजूर केले. त्याचा 39 हजार 981 शेतकऱ्यांनी लाभ घेतला. मात्र, अजूनही पुन्हा एकदा 28 कोटी 30 लाखांची मागणी करण्यात आली आहे. याबद्दल शंका उपस्थित झाली असून, समितीमार्फत चौकशी सुरू करण्यात आली होती.

बोगस लाभार्थ्यांना लाभ

पंचनाम्यानुसार सरकारने अनुदान दिले. मात्र, अजूनही या अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित आहेत. त्यांच्यासाठी 28 कोटी 30 लाखांची मागणी करण्यात आली आहे. मग पहिल्या दोन टप्प्यांमध्ये बोगस लाभार्थ्यांना लाभ मिळाला का, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. या साऱ्या घोळाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांनी एक खुलासापत्र सादर केल्याचे समजते. त्यात गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे 33 टक्केंच्या आतील शेतकऱ्यांचे उत्पन्न 33 टक्केंच्या वर गेले. याच्या तक्रारी आल्या. त्यामुळे पुन्हा पिकांची पाहणी केली आणि 33 टक्केंच्या वरील नुकसानीच्या याद्या सादर केल्या. कोरोना लाटेमुळे या कामात उशीर झाल्याची पुस्तीही जोडली आहे. मात्र, या साऱ्या प्रकरणावर वरिष्ठ स्तरावरून अनुदान वाटपाची चौकशी सुरू करण्यात आली. त्यासाठी एका चौकशी समितीची स्थापना करण्यात आली असून, त्यात अपर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि कृषी विभागाच्या आत्मा तांत्रिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनाही स्वतंत्र चौकशीचे आदेश दिल्याचे समजते.

चौकशी अहवाल तयार

या साऱ्या प्रकरणाचा चौकशी अहवाल तयार झाला असल्याचे समजते. यात दोषींवर दिवाळीनंतर कारवाई होऊ शकते. तसा विचार प्रशासनाने केला आहे. मात्र, असाच एक प्रकार दिंडोरी तालुक्यात झाला असल्याची चर्चा आहे. त्याची चौकशी होणार का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. कारण अतिवृष्टीत नुकसान झालेले नसतानाही अनेक जण लाभ पदरात पाडून घेत आहेत. याबद्दल शेतकऱ्यांमध्ये रोष आहे.

इतर बातम्याः

टी-20 वर्ल्डकप सामन्यांवर सट्टा; नाशिकमध्ये 5 लाखांच्या मुद्देमालासह दोघांना बेड्या

हुरहुर लावणारा पिंपळपार पुन्हा बहरणार; दिवाळी पाडव्याला नाशिकमध्ये पंडित हरीश तिवारींची मैफल!

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us