आदर्श ग्रामपंचायत गंगापूर, भावी सरपंचांनो इकडे लक्ष द्या !

पाणी, स्वछता, रस्ते, विज, आरोग्य, शिक्षण अशा अनेक बाबतीत गंगापूर सध्या स्वावलंबी आहे (Adarsh Gram Panchayat Gangapur story).

आदर्श ग्रामपंचायत गंगापूर, भावी सरपंचांनो इकडे लक्ष द्या !
| Updated on: Dec 29, 2020 | 8:04 PM

लातूर : राज्यात सध्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरु आहेत. हजारो भावी सरपंच गावाच्या विकासासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निवडणुका येतात आणि जातात मात्र बहुतांश गावांचा सर्वांगीण विकास प्यानेलच्या राजकारणात अडकलेला पहायला मिळतो. मात्र अशी काही गावे आहेत, ज्यांचा आदर्श राज्यातल्या इतर ग्रामपंचायतींनी घ्यायला हवा (Adarsh Gram Panchayat Gangapur story).

लातूर जिल्ह्यातलं हे गंगापूर गाव! गंगापूरची लोकसंख्या 15 हजार आहे. गेल्या तीन वर्षात इथे दहा कोटींचा निधी विकासासाठी वापरण्यात आला आहे. पाणी, स्वछता, रस्ते, विज, आरोग्य, शिक्षण अशा अनेक बाबतीत गंगापूर सध्या स्वावलंबी आहे (Adarsh Gram Panchayat Gangapur story).

गावकऱ्यांना मोफत पाणी

गंगापूर ग्रामपंचायतीने 3 कोटी लिटर क्षमतेचं सार्वजनिक शेततळे उभारले आहेत, ज्यामधून गावाला वर्षभर पाणी पुरवठा केला जातो. पिण्याच्या स्वछ पाण्यासाठी गावात चार जलशुद्धीकरण केंद्र आहेत, ज्यामधून गावकऱ्यांना मोफत पाणी दिले जाते.

शहरातल्या रस्त्यांना लाजवेल असे रस्ते

गावात 42 किलो मीटरचे सिमेंट रस्ते करण्यात आले आहेत. गावात जाणारा मुख्य रस्ता तर शहरातल्या रस्त्यांना लाजवेल असाच आहे. घरपट्टी आणि नळपट्टी नियमित भरणाऱ्या गावकऱ्यांना दळण आणि मिरची कांडपाची सोय वर्षभर मोफत आहे.

शेतातून माल आणण्यासाठी ट्रॅक्टर

ग्रामपंचायतीकडे स्वतःच्या मालकीचा ट्रॅक्टर आणि टँकर आहे. गरज पडेल ती व्यक्ती पंचायतीशी संपर्क करून ट्रॅक्टर शेतातून माल आणण्यासाठी वापरू शकते.

आणखी भरपूर सुविधा

समशानभूमीचा विकास, दर्गाहचे बांधकाम, सार्वजनिक शौचालय, अल्पसंख्याक सभागृह, सभामंडप, सोलार पम्प, ग्रामपंचायतीची नवीन इमारत, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी पंचायतीचे अभ्यास केंद्र, हे सगळं इथे साकारण्यात आले आहेत. गावाच्या विकासात सरपंचाला रस असला कि कसा काया पालट होतो, याचं हे उत्तम उदाहरण!

सत्ता कोणाचीही असो गावाच्या विकासाचा ध्यास मनी असला कि निधी आपोआप गावाकडे वळतो. गंगापूरमध्ये 14 व्या वित्त आयोगाच्या निधीवर अवलंबून न राहता वेगवेगळ्या विभागातून निधी आणण्यात आला आहे. त्यामुळे गावातले लोक ग्रामपंचायतीवर समाधान व्यक्त करतायत!

सगळ्याच गावात गटा-तटाचं आणि जातीचं राजकारण असतं. मात्र समतोल साधून गावाला विकासाच्या प्रवाहात आणने सरपंचाला जमले पाहिजे, म्हणून भावी सरपंचांनो इकडे लक्ष द्या. गंगापूरसारखं काम तुमच्या हातून घडायला हवं!

संबंधित बातम्या :

भाजपच्या गडात मनसेची ताकद, ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मनसैनिक आक्रमक