अहिल्यानगरमधून कोण गाठणार विधान परिषद? एकूण किती मतदार, कोणत्या पक्षाची ताकद जास्त? वाचा…
Ahilyanagar MLC Election : अहिल्यानगर विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक तब्बल चार वर्षांनंतर होत आहे. कोणत्या पक्षाची किती ताकद आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या 16 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, अहिल्यानगरमध्येही राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून गेलेले आमदार अरुण जगताप यांचा कार्यकाळ 2022 मध्ये संपला होता, त्यानंतर तब्बल चार वर्षांनी ही निवडणूक प्रक्रिया होत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका प्रलंबित असल्याने मतदारसंख्या कमी झाली असून, सध्या या निवडणुकीत 461 मतदार मतदान करणार आहेत. ही आमदारकी आपल्या पक्षाकडेच राहावी यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात इच्छुकांची संख्या मोठी असल्याचे चित्र आहे.
2022 नंतर निवडणूक
अहिल्यानगर विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक तब्बल चार वर्षांनंतर होत आहे. यापूर्वी एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अरुण जगताप हे या मतदारसंघाचे आमदार होते. त्यांचा कार्यकाळ 2022 मध्ये संपल्यानंतर ही निवडणूक रखडली होती. त्याचवेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही झालेल्या नसल्याने सध्या केवळ महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींचे सदस्यच मतदार असणार आहेत.
अहिल्यानगरमध्ये कोणत्या पक्षाचे किती मतदार?
अहिल्यानगर या मतदारसंघात एकूण 461 मतदार असून, त्यामध्ये भाजपकडे सर्वाधिक 199 सदस्यसंख्या आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे सुमारे 50 सदस्य आहेत. विजयासाठी आवश्यक असलेला आकडा 231 मतांचा आहे. गेल्या वेळी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. मात्र यावेळी भाजपकडूनही या जागेवर जोरदार दावा केला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडूनही ही जागा कायम राखण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
मोर्चेबांधणी सुरू
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अनेक वर्षांनंतर ही निवडणूक होत असल्याने इच्छुकांची संख्या मोठी असल्याचे बोलले जात आहे. अद्याप कोणत्याही पक्षाकडून अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आलेला नसला तरी इच्छुकांनी वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी वाढवल्या आहेत. उमेदवारी आपल्या पदरात पडावी यासाठी राजकीय लॉबिंगलाही सुरुवात झाली आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना पक्ष श्रेष्ठींकडून आश्वासने दिली जातात. विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात हे चित्र नेहमीच पाहायला मिळते. मात्र एकाच पक्षातून अनेक इच्छुकांना शब्द दिले जात असल्याने अखेर उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते आणि विजयाचा गुलाल कोण उधळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.