
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनाने महाराष्ट्र पोरका झाला आहे. प्रशासनावरील पकड आणि कामाचा झपाटा असलेल्या अजित दादांचा आवाज आता कायमचा शांत झाला आहे. मात्र तरी त्यांच्या निधनापूर्वीचा शेवटचा फोन कॉल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. बारामती पक्ष कार्यालयात अजित दादांची शेवटची ऑडिओ क्लिप ऐकवण्यात आली. ती ऐकताना कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहेत.
काटेवाडी येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते श्रीजीत पवार यांनी अजित दादांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेवटच्या संवादाबद्दल सविस्तर माहिती दिली. श्रीजीत यांनी सकाळी ८ वाजून १९ मिनिटाला दादांना एका कामासंदर्भात मेसेज केला होता. बहुधा विमान हवेत असल्याने मेसेजला लगेच उत्तर मिळाले नाही, मात्र विमान लँडिंगसाठी जवळ येत असताना रेंज मिळताच दादांनी तत्परतेने ८ वाजून ३७ मिनिटांनी श्रीजीत यांना कॉल केला.
श्रीजीत पवार यांच्याशी अजित पवारांनी सुमारे एक मिनिटाचा संवाद साधला जात आहे. या संभाषणात अजित पवारांच्या आवाजात तीच कामाची ओढ आणि सर्वसमावेशकतेची भावना दिसून आली. श्रीजीत यांनी सांगितले की मी इतका महत्त्वाचा नव्हतो की दादांनी लँडिंगच्या वेळी मला फोन करावा, पण प्रत्येक मेसेजला रिप्लाय देण्याचा त्यांचा स्वभाव होता.
अजित पवार: अरे बाबा, दिगंबर दुर्गाडे हे माळी समाजाचे नेतृत्व आहेत. त्यांना अनेक वर्षांनंतर संपूर्ण जिल्ह्याच्या बँकेचा चेअरमन मी स्वतः केलं आहे. तुम्हाला अनेकदा वस्तुस्थिती माहिती नसते आणि तुम्ही काहीही बोलता. आम्ही राजकारण करताना सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जातो, हे लक्षात घे.
श्रीजीत पवार: दादा, मला जे वाटलं ते मी बोललो.
अजित पवार: तुझं म्हणणं मान्य आहे, पण वस्तुस्थिती समजून घे. आताही जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुपे गटातून मी माळी समाजाला उमेदवारी दिली आहे. इतर कोणत्याही पक्षाने असा निर्णय घेतलेला नाही, पण आपण समाजाला प्रतिनिधित्व दिलं आहे. अशा पद्धतीने आम्ही सर्वांना न्याय देण्याचं काम करतोय.
श्रीजीत पवार: ठीक आहे दादा, तुम्हाला जो निर्णय योग्य वाटतो तो अंतिम निर्णय आहे, मी फोन ठेवतो. धन्यवाद!
यानंतर अजित पवार आणि श्रीजीत पवार यांच्याशी असलेला संवाद संपला. त्यानंतर काहीच वेळात नियतीने घात केला.
अजित दादांच्या निधनानंतर बारामती आणि संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. दादांचा शेवटचा आवाज ऐकायला मिळावा, ही सर्वांची इच्छा होती म्हणून आम्ही ही क्लिप ऐकवली, असे श्रीजीत यांनी सांगितले. अजित पवारांचा कामाचा व्याप आणि शेवटच्या श्वासापर्यंत सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची जिद्द ही शेवटच्या संवादातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.