Ajit Pawar on Rane| उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शेलकी टोलेबाजी; म्हणाले, राणेंनी उणीदुणी काढण्यापेक्षा…

| Updated on: Jan 02, 2022 | 11:59 AM

अजित पवार म्हणाले की, राज्यपाल ही महत्वाची व्यक्ती आहे. त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, आम्ही कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सातत्याने खबरदारी घेतोय.

Ajit Pawar on Rane| उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शेलकी टोलेबाजी; म्हणाले, राणेंनी उणीदुणी काढण्यापेक्षा...
Ajit Pawar, Narayan Rane.
Follow us on

पुणेः उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर खास आपल्या शैलीत जोरदार टोलेबाजी केली. शिवाय सिंधुदुर्ग जिल्हा बँक ज्यांच्या ताब्यात गेलीय, त्यांनी चांगलं काम करावं, असं म्हणत शरसंधान साधलं. सिंधुदुर्ग बँकेच्या निवडणुकीवरून सुरू असलेले धुमशान अजूनही आरोप-प्रत्यारोप आणि टीकेमुळे कायम आहे. आता यावर राणेंची प्रतिक्रिया काय येते, हे पाहावे लागेल.

ते बी केंद्रात मंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोकणात आम्ही काय मदत केली हे सगळ्यांना माहिती आहे. तौक्ते चक्रीवादळात मदत केली. बंधारे बांधतोय. राणेंनी इतरांची उणीदुणी काढण्यापेक्षा ते बी केंद्रात मंत्री आहेत. त्यांनीही निधी आणावा. कामे करावी. सिंधुदुर्ग जिल्हा बँक ज्यांच्या ताब्यात गेलीय. त्यांनी चांगलं काम करून दाखवाव, असं म्हणत अजितदादांनी राणेंवर शरसंधान साधले.

तो राज्यपांलाच प्रश्न

अजित पवार राज्यपालांबद्दल बोलताना म्हणाले की, राज्यपाल ही महत्वाची व्यक्ती आहे. त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, आम्ही कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सातत्याने खबरदारी घेतोय. सातत्याने लोकायुक्तांकडे तक्रारी येतात. यामध्ये तथ्य असेल, तर वस्तुस्थिती सगळ्यांसमोर येईल, तथ्य नसेल तर त्यांच्याही लक्षात येईल की हे चुकीच्या पद्धतीने तक्रारी करतात, म्हणत भाजपवर निशाणा साधला.

काही लोकांचा वेगळा विचार

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत अजित पवार म्हणाले की, काही लोक वेगळा प्रचार करत आहेत. काही जागा मी बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने आम्हाला यश आले नाही. आम्ही आमच्या परीने आमच्या विचाराचे लोक निवडूण आणण्याचा प्रयत्न करतोय. हवेली पुणे, पिंपरी चिंचवडनंतर विचार करायचा झाल्यास सर्वात जास्त मतदान बारामती येथे झाले आहे. बारामती येथे सातशे मते असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रलोभनावर खंत

अजित पवार म्हणाले की, गेली तीस वर्षांपासून आम्ही बँक चांगल्या प्रकारे करत आहोत. यावेळी लोकांनी सहकार्य करावे अशी आमची विनंती आहे. दोन महिला, क आणि ड वर्गात निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत कोणी जातीवादाचा तर कोणी पाहुणे असल्याचा आरोप केला आहे. आम्ही पाच लाखापर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांना देतो. जनरल निवडणुकीत सोपे जाते. मात्र, येथे मतदार कमी असल्यामुळे ही निवडणूक जिकरीची होते. काही प्रलोभने मिळाली तर अवघड होऊन जातं, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

इतर बातम्याः

Nashik Election|नाशिकमध्ये 500 चौरस फुटापर्यंत घरपट्टी माफ करण्याच्या हालचाली; भाजपची शिवसेनेवर कुरघोडी

Nashik| अजब तुझे सरकार…अन् मृत ग्रामसेवकाच्या नावावरची 28 लाखांची वसुली टळली…!