अजितदादा निवडणूक लढवणारच, मध्येच शस्त्र टाकणार नाही…राष्ट्रवादीतील बड्या नेत्याचा दावा

अजित पवार निवडणूक लढवणार आहे. ते मध्येच शस्त्र टाकू शकत नाही. लोकसभा निवडणुकीत जे झाले त्यासंदर्भात व्यथा त्यांनी मांडली. त्यांचे वय हा मुद्दा नाही. मी तर 78 वर्षांचा आहे. मला ते निवडणूक लढवण्यास सांगतात. मग ते का लढवणार नाही, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

अजितदादा निवडणूक लढवणारच, मध्येच शस्त्र टाकणार नाही...राष्ट्रवादीतील बड्या नेत्याचा दावा
अजित पवार
Jitendra Zavar | Updated on: Sep 09, 2024 | 10:50 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन् राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मतदार संघातून निवडणूक न लढवण्याचे संकेत पुन्हा एकदा दिले. त्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ माजली. विविध पक्षांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आता अजित पवार यांच्या पक्षातील बडे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यासंदर्भातील चर्चांना पूर्णविराम दिला आहे. अजित दादा आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहेत. ते निवडणूक लढवणार आहे. ते मध्येच शस्त्र टाकू शकत नाही. लोकसभा निवडणुकीत जे झाले त्यासंदर्भात व्यथा त्यांनी मांडली. त्यांचे वय हा मुद्दा नाही. मी तर 78 वर्षांचा आहे. मला ते निवडणूक लढवण्यास सांगतात. मग ते का लढवणार नाही, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

महायुतीत एकमेकांच्या विरोधात वक्तव्य नको

देशाचे गृहमंत्री अमित शहा मुंबईत आले आहेत. त्यांनी वाद निर्माण करू नका, हे सांगणे स्वाभाविक आहे. कोणताही नेता हेच सांगणार आहे. आधी विजय संपादन करा, असे भुजबळ यांनी म्हटले. महायुतीच्या तिन्ही घटकांना चांगले यश मिळवयाचे असेल तर त्यांनी एकमेकांवर वक्तव्य करू नये. विरोधकांना खाद्य देऊ नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ही सूचना केली आहे.

मविआ काळात दोन वर्ष उशिराने पैसे मिळाले

काही योजनांचे पैसे जमा होती नाही, हा आरोप विरोधकांकडून सुरु झाला आहे. त्यावर बोलताना भुजबळ म्हणाले, सरकार सर्वांचे पैसे देणार आहे. जशी पुंजी जमा होते तसे पैसे दिले जातील. एखाद्या योजनेचे पैसे देण्यास उशीर होणे हे काही नवीन आहे का? काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारच्या काळात 2/3 वर्षे उशिरा पैसे मिळत होते. कधीही पैसे असताना प्राधान्य कशाला द्यावे, हे ठरवले जाते, असे भुजबळ यांनी म्हटले.

रस्त्यांची कामे चांगली

दिवाळीनिमित्त देण्यात येणारा आनंदचा शिधा सर्वांपर्यंत पोहचणार आहे. मागच्या वेळी 99.99 टक्के लोकांपर्यंत हा शिधा पोहचला होता. नाशिक मुंबई रस्त्यावर निर्माण झालेल्या खड्ड्यांसंदर्भात बोलताना भुजबळ म्हणाले, मी रविवारी अडीच पावणेतीन तासांत मुंबईहून नाशिकमध्ये आलो. रस्त्याचे काम चांगल्या पद्धतीने होत आहे. लोकप्रतिनिधी यांनी नाशिकच्या खड्यांबाबत आवाज उठवला आहे. आता आयुक्त आणि अधिकारी लक्ष देतील.

Follow Us