
राष्ट्रवादीचे नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं गेल्या आठवड्यात ( 28 जानेवारी) विमान अपघातात निधन झालं. ते काही सभांसाठी विमानाने मुंबईहून बारामतील जात होते, तेव्हाच बारामतीजवळ त्यांचं विमान आल्यावर लँडिंगवेळी ते अचानक क्रॅश झालं आणि स्फोट झाला. यामध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह विमानातील एकूण 5 जणांचा मृत्यू झाला. मात्र हे विमान कोसळण्यापूर्वी, प्रवासात असतानाहीअजित पवार कामात होते. त्याचदरम्याान त्यांनी एक कॉल केला होता, तो त्यांचा शेवटचा कॉल ठरला. नुकतीच बारामती पक्ष कार्यालयात अजित दादांची शेवटची ऑडिओ क्लिप ऐकवण्यात आली. ती ऐकताना कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते.
काटेवाडी येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते श्रीजीत पवार यांनी अजित दादांशी संवाद साधला होता, दादांशी काय बोलणं झालं ते त्यांनी सविस्तर सांगितलं होतं. या संभाषणात अजित पवार यांना असलेली कामाची ओढ आणि सर्वसमावेशकता हे दिसू आलं. याच संभाषणात त्यांनी बोलता बोलता दिगंबर दुर्गाडे यांचा उल्लेख केला होता. अजित दादांनी दिगंबर दुर्गाडे यांचं नाव घेतलं. श्रीजीत यांच्याशी बोलतान अजित दादांचं पूर्ण संभाषण काय झालं, तसेच दादांनी ज्यांचं नाव घेकलं त्या दिगंबर दुर्गाडे यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे.
कोण आहेत दिगंबर दुर्गाडे ?
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. दिगंबर दुर्गाडे हे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुरंदरचे अध्यक्ष आहेत. ते पुरंदर तालुक्यातील वाल्हे गावचे रहिवासी असल्याचं समजतं. श्रीजित यांच्याशी बोलताना अजित पवारांनी दिगंबर दुर्गाडे यांचा उल्लेख केला होता. दिगंबर दुर्गाडे हे माळी समाजाचे नेतृत्व आहेत. त्यांना अनेक वर्षांनंतर संपूर्ण जिल्ह्याच्या बँकेचा चेअरमन मी स्वतः केलं आहे. आम्ही राजकारण करताना सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जातो, असं अजित पवार म्हणाले होते.
दिगंबर दुर्गाडे यांची प्रतिक्रिया काय ?
अजित पवारांच्या शेवटचं संभाषण व्हायरल झाल्यानंतर आणि त्यात नाव आल्यानंतर दिगंबर दुर्गाडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ” दिवंगत उपमुख्यमंत्री, अजित पवार यांचा (Ajit Pawar) शेवटचा कॉल रेकॉर्ड व्हायरल झाला, त्यांचं रेकॉर्डिंग चर्चेत आलं. त्याबद्दल मला अनेक जणांनी (मला) प्रतिक्रिया विचारली. त्याचा रेफरन्स म्हणजे,बारामती किंवा तिकडच्या एखाद्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या किंवा पंचायत समितीच्या तिकीटीच्या संदर्भात कार्यकर्त्यांना समजावून सांगताना दादांनी तो उल्लेख केला असेल, असं मला वाटतंय”, असं दुर्गाडे म्हणाले.
” खरंतर दादांसारखा मोठा नेता,माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांना तो मेसेज द्यायचा होता. अजितदादा महाराष्ट्राचे फार मोठे व्यक्तीमत्व होते, त्यांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन राजकारण करण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला. आपण पाहिलं की राज ठाकरे साहेब जेखील त्यांच्या देखील त्यांच्याबद्दल म्हणाले होते की, अजित पवार आणि माझ्यात काही मतभेद असतील. पण हा माणूस जात-पात मानणारा नव्हता, तो जातीपलीकडे जाणारा माणूस होता. हे त्यांचं स्टेटमेंट होतं. मला वाटतं त्या कॉल रेकॉर्डिंगमधून दादा तोच विचार त्या कॉल रेकॉर्डमधून कार्यकर्त्याला समजावून सांगायचा प्रयत्न करत होते. जात पात मानणारा मी नाही असं दिसून आलं असंही ते पुढे म्हणाले” असं दुर्गाडे यांनी सांगितलं.
” माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दादांनी जिल्हा बँकेवर इतकी वर्ष संधी दिली. पहिलं तिकीट अजित दादांनीच दिलं होतं. 1997 साली पहिल्यांदा जिल्हा परिषदेचे तिकीट मला दिलं होतं. आणि आज माझ्या मुलीलासुद्धा शेवटचं तिकीट त्यांनी दिलं आहे. दादांनी शेवटचे हे तिकीट जिल्ह्याला नव्हे, तर महाराष्ट्राला दिलं आहे. दादांना खरी श्रद्धांजली म्हणून, हे निवडून आणावं. दादा आता नाहीत. मात्र दादा सगळ्याच कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जात होते, हे यातून सांगण्याचा प्रयत्न आहे. आम्ही सगळेजण तेच सगळे विसरून काम करू”, असंही दुर्गाडे म्हणाले.
काय होता अजित पवार आणि श्रीजीत पवार यांचा संवाद ?
अजित पवार: अरे बाबा, दिगंबर दुर्गाडे हे माळी समाजाचे नेतृत्व आहेत. त्यांना अनेक वर्षांनंतर संपूर्ण जिल्ह्याच्या बँकेचा चेअरमन मी स्वतः केलं आहे. तुम्हाला अनेकदा वस्तुस्थिती माहिती नसते आणि तुम्ही काहीही बोलता. आम्ही राजकारण करताना सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जातो, हे लक्षात घे.
श्रीजीत पवार: दादा, मला जे वाटलं ते मी बोललो.
अजित पवार: तुझं म्हणणं मान्य आहे, पण वस्तुस्थिती समजून घे. आताही जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुपे गटातून मी माळी समाजाला उमेदवारी दिली आहे. इतर कोणत्याही पक्षाने असा निर्णय घेतलेला नाही, पण आपण समाजाला प्रतिनिधित्व दिलं आहे. अशा पद्धतीने आम्ही सर्वांना न्याय देण्याचं काम करतोय.
श्रीजीत पवार: ठीक आहे दादा, तुम्हाला जो निर्णय योग्य वाटतो तो अंतिम निर्णय आहे, मी फोन ठेवतो. धन्यवाद!
असा संवाद अजित पवार आणि श्रीजित यांच्यात झाला. त्यानंतर काहीच वेळात विमान कोसळलं आणि अजित पवार यांचं निधन झालं.